जैन धर्म हा पुरातन धर्म समजला जातो. चोवीस तिर्थकरांनी या धर्माच्या अभ्यास केला.
सृष्टीतील सर्व गोष्टीचा अभ्यास केला, ध्येय ठरविले व त्याप्रमाणे आचरण केले.
तेथे ज्ञान, दर्शन, चारित्र्य उदयास आले.
जैन धर्माची मूलभूत कल्पना अशी – कोणत्याही गोष्टीचे सखोल ज्ञान करुन घ्या, अंधश्रद्धेने कुणावर विसंबून राहू नका, तुमच्या मनाला ज्ञानी बनवा व त्या ज्ञानी मनाच्या आज्ञेप्रमाणे आपले वागणे ठेवा. त्याप्रमाणे तपाचरण करा.
आपले जीवन जगा दुसर्याला जगू द्या तुमची दृष्टी बदला. बाह्य गोष्टीचे आकर्षण ठेवून त्याप्रमाणे वागु नका. अंतरात्मा काय म्हणतो याकडे लक्ष द्या.
प्रपंच हा अनेक लोकांनी एकत्र येऊन करण्याचा प्रकार आहे. त्यामध्ये इतरांचा विचार करावा लागतो. त्यांच्या अपेक्षा विचारात घ्याव्या लागतात, तेव्हा त्या प्रपंचाकडे पण पहाताना आसक्ती विरहीत होऊन पाहिले पाहिजे.
परिस्थितीचा अभ्यास सम्यक भावनेने केला पाहिजे.
तरच तुमच्या मनामध्ये समतोल विचार येतील. क्षमा भाव उत्पन्न होईल व तो टिकविण्यासाठी जरुर ते तप तुम्ही करु शकाल.
ही मूळ संकल्पना ध्यानात घेऊन तिर्थकरांनी सम्यक ज्ञान, दर्शन चारित्र्य या तत्वांचा प्रचार आपल्या प्रवचनातून साधकाला दिला.
त्यामुळे जैन धर्म हा मानवतावादी धर्म संबोधला जातो.
या सृष्टीत असणार्या एकेंद्रिया पासून पंचेद्रिय पर्यंत असणार्या सर्व जीवांचे रक्षण, पालन पोषण करणे हे आपले आद्य कर्तव्य जैन धमामध्ये सांगितले आहे.
अशा या विश्वव्यापक मानवता वाद सांगणारा व त्याचे आचरण करणारा धर्म दयावंत धर्म म्हणून संबोधला जातो.
जैन धर्मियांनी याचा सातत्याने पाठपुरावा करावा.
सर्व ज्ञानी जनांना दु:खापासून मुक्ती मिळविण्याचा सम्यक ज्ञान हा महामार्ग आहे.
असा ज्ञानी साधक सतत आनंदात रहातो तो जीवनातील प्रत्येक कर्म पूर्ण समजुतीने पूर्ण करतो.
त्यामध्ये त्याला ताण तणाव जाणवत नाही. तो शांततेने व प्रसन्नतेने हे काम करीत असतो.
तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य ही त्रिसूत्री गरजेची आहे.