विल्हेवाट

नविन वस्तु येण्याआगोदर जुन्या वस्तुला रस्ता करुन देणे, जागा मोकळी करणे, याला विल्हेवाट म्हणतात.

प्रपंचात प्रत्येकवळी आपण नवीन नवीन वस्तू आणत असतो. चांगले कपडे आणतो, दागदागिने, अलंकार आणतो, चांगल्या वाहाणा आणतो, चांगल्या गाड्या आणतो असे करीत करीत घर वस्तुंनी भरुन जाते.

अशा या वस्तु शेवट घराला अडगळीचे स्वरुप आणतात. त्याच वेळी जर आपण विवेक जागृत करुन नको असलेल्या एक एक वस्तु ज्याला गरज आहे, त्याला देत गेला तर ज्याला देवू त्याला मिळाल्याचे समाधान होते व जो देतो त्याला दिल्याचे व अडगळ कमी झाल्याचे समाधान होते.

असा हा एकाची अडचण दुसर्‍याची पर्वणी असा व्यवहार सुरु होतो. येथे विल्हेवाट सुरु होते.

प्रपंचात पण सुज्ञ मंडळी नवीन वस्तु आणण्या पुर्वी जुन्या वस्तुची विल्हेवाट लावतात व नवीन वस्तुची मांडणी करतात.

यामुळे घरात साठणारा कचरा दूर होतो. घरात स्वच्छ वातावरण निर्माण होते. टापटीप दिसू लागते.

या जगात पुन:वापराचे चक्र सतत चालू आहे. जुने द्या नवे घ्या या नियमाने नको असलेल्या वस्तु गरजुंना द्या, त्यांचा प्रपंच आनंदी करा व नवीन वस्तु आणून तुमचा प्रपंच नेटका करा.
नुसतेच नवीन नवीन वस्तु आणून घर भरु नका. जुन्यावरची ममता आसक्ती सोडा व नव्याचे स्वागत करा. प्रपंचात पण या विल्हेवाटीला फार महत्व सांगितले आहे.

माणूस आयुष्यभर अनेक गोष्टी आपल्याशा करतो व एक दिवस हा प्रपंच सोडून जातो.

तेव्हा नातेवाईक मित्र मंडळी म्हणतात आता या संपत्तीची विल्हेवाट कशी लावणार.

एकजण म्हणतो प्रथम आपण ज्याने या सर्ववस्तु जमा केल्या आहेत. त्याची अग्नीसंस्कार करुन विल्हेवाट लावू व मग इतर गोष्टींकडे पाहू.

देहातीत झाल्यानंतर ते शव कोणी संग्रही ठेवत नाही. त्याची विल्हेवाट लावतातच. तेव्हा विवेकी माणसाने आपल्या संपत्तीचे इच्छापत्र किंवा वाटपपत्र करुन त्या संपत्तीची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. ही गोष्ट त्या माणसाने जीवंत असतानाच केली पाहिजे अन्यथा तेथे कलह उत्पन्न होऊ शकतो.

पुढील पिढीचा उत्कर्ष साधणेसाठी चालू संपत्तीची व्यवस्थित विभागणी केली तर इच्छित उत्कर्ष लाभेल. जे या प्रमाणे संपत्तीची विल्हेवाट करीत नााहीत तेथे कलह वाढतो. व्यसनाधीनता दिसून येते व प्रपंचाची वाट लागते. तेव्हा प्रपंचात विल्हेवाट याला किती महत्व आहे हे ध्यानात घ्यावे
अशी विल्हेवाटीचा एक सुंदर बोधकथा समोर येते. एका आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी गुरुजनाबरोबर राहून संस्कार घेत असतात.

एक दिवस एक शिष्य गुरुपाशी आस व हट्ट धरुन बसला, मला पूजा करण्यासाठी नवे कोरे रेशमी वस्त्र हवे आहे. खूप हट्ट केल्यानंतर गुरुजींनी त्याला एक नविन वस्त्र दिले. ते वस्त्र लेवून तो शिष्य आनंदात सर्वत्र फिरला. सायंकाळी गुरुजींनी त्याला जवळ बोलाविले व विचारले, तुझ्या जुन्या वस्त्राचे काय केले? शिष्य म्हणाला, मी त्याचे आसन तयार केले व त्यावर बसून नामस्मरण केले. पुढे गुरुजी त्याला म्हणाले, जुन्या आसनाचे काय केले? तेव्हा तो मुलगा म्हणाला घरात खिडकीला जो पडदा होता तो बराच खराब झाला होता, तेव्हा त्याचा पडदा तयार केला. गुरुजींची जिज्ञासा वाढली त्यांनी पुढे विचारले त्या जुन्या पडद्याचे काय केले? तेव्हा तो म्हणाला त्या पडद्यातील सुंदर, अखंड असे धागे मी एकत्रित केले व त्याची पायघडी तयार करुन आपल्या सेवेसाठी घेऊन आलो आहे.
गुरुजी थक्क झाले. एवढ्या छोट्या शिष्याने केलेली ही जुन्या वस्त्राची विल्हेवाट पाहुन गुरुजी अवाक झाले गुरुजीनी उठून जेेष्ठ नागरिकांना संबोधले, जीवन हे असेच आहे. जीवन म्हणजे परमेश्‍वराने आपणास दिलेले रेशमी वस्त्र आहे पण हे वस्त्र आपणाकडे आले म्हणून पुर्वीच्या वस्त्राकडे दूर्लक्ष करु नका. चांगल्या संस्काराचे चिंतन मनन करा. त्या संस्कारांनी जीवनाची चांगली विल्हेवाट लावा. तुमचा प्रपंच आनंदी होईल, तुम्हाला कृतकृत्य वाटेल.

Leave a comment