त्यागात खरे समाधान

समाधान ही अशी गोष्ट आहे, की ती सांगु म्हणता सांगता येत नाही, न सांगता जे चेहर्‍यावर उमटते, वागण्यात दर्शविते, ते समाधान होय.

साखरेची गोडी वर्णन करता येत नाही किंवा वर्णावी म्हणले तर ते शक्य होत नाही. तिथे चिमुटभर साखर तोंडात टाकणे एवढेच करावे लागते.

तसे आयुष्यात सुख समाधान कशात आहे हे फक्त अनुभवाने दाखविता येते. नुसते बोलून ते लक्षात येत नाही.

कांहीजण म्हणतात, मुलां-मुलींची लग्न शिक्षण झाली की मी समाधानी होईन. कांही जण म्हणतात पैसा, जमीन-जुमला, घर, गाडी या गोष्टी आल्या की मी समाधानी होईन. पण जीवनात या सर्व गोष्टी असलेले किती लोक समाधानी आहेत?

नुसत्या असण्यात काही समाधान नाही. असण्याने हाव वाढतच जाते. जस जसे असणे वाढते, तस तसे हसणे कमी होत जाते. अपेक्षा वाढत जातात. त्यापूर्ण करता करता प्रपंचात फजीती होत जाते. तेव्हा असण्यात अपेक्षित समाधान, सुख नाही हे लक्षात घ्या.

मग शाश्‍वत समाधान मिळणेसाठी काय करावे? जे समाधान कधीच कमी होणार नाही हे प्राप्त करावयाचे असेल तर शाश्‍वत समाधानाचे बीज प्रपंचाच्या भूमातीत पेरले पाहिजे. त्याला चांगले खतपाणी घालून ते पोसले पाहिजे.

एक बी पेरले तर हजारो कणसाचे समाधान शेतकरी मिळवू शकतो तर थोड्याशा दानात अखंड आयुष्यभर लाभेल असे समाधान कां मिळणार नाही? नक्की मिळेल, पण तेथे वृत्ती पाहिजे देण्याची.

आपणाला समाधान हवे असेल तर थोडे समाधान आपण इतरांना दिले पाहिजे. त्याग करा व समाधान मिळवा हा नियम विसरु नका.

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हा नियम नजरेस येतो. माणसा प्रमाणे निसर्गात सुद्धा हा नियम पहावयास मिळतो.

वसंत ऋतु येताच झाडांची पतझड सुरु होते. जुनी जीर्ण पाने गळून पडतात. झाडं त्यांचा त्याग करतात. तर निसर्गातून नवी पालवी त्यांचे ठिकाणी दिसू लागते. पालवीतून फळे, फुले दिसू लागतात. ही झाडातून, त्यांच्या त्यागातून झालेली रम्य सृष्टी होय.

पण प्रथम तेथे त्याग केलेला असतो. हे आपण विसरुन चालत नाही. जे संचय करतात, कंजुष वागतात, इतरांचा विचार करीत नाहीत, स्वत:पुरताच प्रपंच करतात ते त्या प्रपंचातच गाडले जातात. त्यांना खरे सुख काय याची जाणीव होत नाही. ती दृष्टी त्यांना प्राप्त होत नाही.

ही दृष्टी प्राप्त व्हावी, हे समाधान मिळावे यासाठी माणसाने नित्य थोडे तरी दान करावे, त्याग करावा, समाधान पहावे.

आनंदी जीवन जगावे…!

Leave a comment