सुख दु:खाचा लपंडाव

लपंडाव हा माझा लहानपणीचा आवडता खेळ. तेव्हा सुख दु:खाचा लपंडाव काय असतो हे पहाण्यची मला उत्सुकता लागली.

माझ्या समोर त्यावेळी माझी राजस्थान सहल आली. तेथे उंटावर बसून वाळवंटातून मैलोनमैल प्रवास केलेला आठवला. रखरखते ऊन व कासावीस करणारी तहान यामुळे मी बेचैन होत होतो.

कुठे थोडे पाणी मिळेल का? याची मी वारंवार विचारणा करत होतो. उंटाच्या उंच मानेची सावली पुढे पडत होती व मला ते पाणी आहे असे वाटत होते.

पण पुढे पुढे जात असताना ते मृगजळ असल्याचे लक्षातं येत होते. तहान माझा पिच्छा सोडत नव्हती.

तेथे पाणी व तृष्णा यांचा लपंडाव चालू होता. या लपंडावात मी खूप त्रासलो, माझे मन उद्विग्न झाले.

पण हा खेळ लहानपणीच्या लपंडावाप्रमाणे मजेशीर होता.

माझ्या मनांचा संकल्प दृढ होतो. तेव्हा त्रासाने तहानेने भरलेल्या या खोक्यावर मी आनंदाचे लेबल चिटकवले. तेथे दु:ख हिरमुसले.

त्याला आपण अडचणीत आल्याचे जाणवू लागले. तेव्हा मी मनांत निर्धार केला जीवनांत येणार्‍या प्रत्येक संकटाला आपण हसत सामोरे जायचे, तेथे दु:ख हिरमुसते.

कित्येक वेळा अचानक प्रारब्धाने कोणीतरी आपणाला हात देतो, तेथे माझा लपंडाव यशस्वी होतो.

एकाला पकडलं तर दूसरा उभा असतो, त्याच्याशी आपणाला लपंडाव करावयाचा असतो. तो गडी त्याचे डाव टाकत असतो, आपणाला खेळवून खेळवून दमवीत असतो.

पण जर आपण स्थिर राहिलो, विवेक जागृत केला तर त्या गड्याची पण सरशी आपण मिळवू शकतो.

तेव्हा स्थिरता व विवेक हे दोन गुण आपणास या खेळात सरशी मिळवून देतील.

जीवन हा सुख दु:खाचा लपंडाव आहे. ते जसे पाहू तसे दिसणार आहे. मग जीवन सुंदर म्हणून सुखाचे कां करु नये?

जो सुखाचे म्हणतो त्यालाच ते सुखरुप मिळते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला, तुम्ही सुखी, समाधानी व्हाल.

Leave a comment