वैराग्य याचा अर्थ अलिप्तता, बाजूला होणे. हे होताना काही प्रकार दिसतात.
सत्व, रज, तामस हे माणसातील तीन गुण आहेत. प्रपंचातून बाजूला होताना या तीन गुणाचा प्रभाव त्याच्या वैराग्यदिसून येतो व त्याप्रमाणे त्याचे वैराग्य सात्विक आहे? राजस आहे? कां तामस आहे? हे कळते.
फक्त आणि फक्त शांत राहून अलिप्तता साधा, प्रपंचातील मोहजाळातून बाजूला व्हा.
माणसे हे होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. कांहीजण प्रपंचातील कटकटीला कंटाळून आत्महत्तेचा विचार करतात.
हा विचार म्हणजे तामस वैराग्य होय.
तर कांही जण कठोर साधना करुन या मायाजालातून बाहेर पडण्याचा उद्योग करतात. हे राजस वैराग्य होय.
याप्रमाणे सर्वांचा हेतु एक सारखाच असतो. पण मार्ग वेगवेगळे असतात.
तेव्हा ही अलिप्तता कशी साधायची हे साधकाने विवेकाने ठरवायचे आहे. जो एकदा पूर्ण विचारांती प्रपंचातून कुणाला न दुखवता योग्य वेळ येताच अलगत बाजूला होतो तो खरा सात्विक वैरागी म्हणावा लागेल.
तो परत कधीही प्रपंचाच्या जाळ्यात गुंतत नाही.
निसर्गात सुद्धा ताजीताजी फुले ही कौतुकाचा विषय होतात. ती निरागसफुले आपणास आनंद देतात. कारण ती आपली असतात. आपण ती फुले देवाला वाहतो, तेथे ती देवाची होतात.
तसे प्रपंचात बालके आपलीच असतात पण तारुण्यात लग्नानंतर ती बायकोची होतात. हे सर्व स्थित्यंतर आपण शांतपणे पहात असतो. तसे प्रपंचातून अलगद बाजूला होण्याचे जमले पाहिजे.
प्रपंचात काल आलेली माणसे आज दूर होतात, परकी होतात. जसे आज वाहिलेली फुले उद्या मांगल्य म्हणून निर्माल्य म्हणून आपण निरिच्छ मनाने नदीला अर्पण करतो. त्यावर काही आसक्ती ठेवत नाही. त्यांची आठवण पण ठेवत नाही. अशा प्रकारे साधक प्रपंचातून अलिप्त होतो.
अति तेथे माती,प्रपंचाला अती चिटकून बसू नका. माझे माझे म्हणत कवटाळत बसू नका. जीवनात आनंद उत्पन्न होण्यासाठी मनाची साफसफाई करा. ह्रदयाची शुद्धी करा.
जशी पेरण्या आगोदर जमिनीची मशागत करतात. तेथे भरघोस पिक येते.
तेव्हा सात्विक वैराग्य प्राप्ती साठी दु:ख सोडून द्यावे व योग्य वेळ येताच प्रपंचातून विरक्त व्हावे.
तसे पाहिले तर या जगात कोणी कोणाचे नाही. पण विवेकाने सर्वजणच आपले असतात. सर्वात असून कोणाचे नाही. ही भूमिका जो घेतो, तो खरा सात्विक वैरागी होय.
यासाठी मुखात गोडवा, मनांत प्रेम, वागण्यात नम्रता आणि ह्रदयात गरिबीची जाण असली की सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी घडत जातात.
दुसर्याच्या दारात सुगंधी फुलाचे झाड लावले तर सुगंध आपल्याकडे दरवळत येतो. त्याप्रमाणे इतरांना आनंदी करत आपण सुखी होतो. मात्र यासाठी सात्विक वैराग्य गरजेचे आहे. तोच साधक चिरंजीव पदाला पोहोचू शकतो.
प्रपंच उत्तम करता करता, अलगद भक्तीभावाने सात्विक वैराग्य प्राप्त करीत मोक्षाची वाट धरावी. येथेच जीवनाची इतिश्री होते.
तसा प्रयत्न साधकाने करावा.
1 Comment
drsameerbhandari@gmail.com
सात्विक वैराग्य सुंदर चिंतन आहे
आपणास ते जमले पाहिजे
प्रपंच करत असताना न संतापकरता अलगद बाजूला होणं
कठीण असले तरी अशक्य नाही
तसेच आपण प्रपंचात वागले पाहिजे
संतान मध्ये एकनाथ महाराजांचे
उदाहरण
डॉक्टर साहेब आपले चिंतन फारच सुंदर🙏