पर्युषण पर्व

पर्व, पर्वणी याचा अर्थ आनंदाचा काळ, आनंदाची दिवाळी.

हा पर्वकाळ प्रपंचात पण येतो. आध्यात्मात पण येतो. सण समारंभ हे पर्वच असतात. यामध्ये जास्तीत जास्त आनंद लुटायचा असतो. त्यामुळे या पर्वकाळात विद्यार्थ्यांना सुटी असते. प्रापंचिकाची उलाढाल मोठी होेते व त्याला पण भरघोस नफा मिळतो तो आनंदी होतो.

अशा पर्वांमध्ये पर्युषण हे पर्व जैन धर्मामध्ये आनंददायी काळ सांगितला आहे. या काळात चातुर्मास चालू असतो. साधूसंताचे सानिध्य नियमित घडत असते. काहीतरी तपाचरण रोज सुरु असते.

चांगल्या संस्काराचे बीज या काळात साधकावर पेरले जाते. या पर्व काळामध्ये साधक दर्शन, पूजन, ज्ञानार्जन व तपाचरण करीत असतो.

सानिध्य असते ते संत महंताचे त्यामुळे जैन धर्माची मूळतत्वे म्हणजे ज्ञान, दर्शन, चारित्र्य ही साधकाचे मनावर बिंबवली जातात. त्यातून वात्सल्य भावना निर्माण होते.

या पर्व काळामध्ये वर्षभरातील केलेल्या कर्माचे अवलोकन करावयाचे असते व त्याप्रमाणे परतावा भरावयाचा असतो.

म्हणजे क्षमावृत्ती जागृत करावयाची असते. आपल्या हातून कळत न कळत झालेल्या काया, वाचा, मने चुकांची क्षमा याचना करावयाची असते व इतरांनी पण मोठ्या मनाने ती क्षमा करुन वर्षाचा हिशोब पूर्ण करावयाचा असतो. याला अलोचना म्हणतात.

ही क्रिया या पर्वकाळातच केली जाते. हा पर्वकाळ म्हणजे साधूसंत श्रावक, श्राविका असा चतुर्विध संघ एकच असणारा काळ होय. या सामुदायिक पर्वामध्ये ही संस्कार बीजे पेरली गेली तर पुढील पिढीवर चांगले संस्कार होतील व त्यातून चांगले विचारांचे प्रदर्शन होईल.

म्हणून वर्षातील याच काळात, पर्वात ही आराधना परमेश्‍वराला साक्ष ठेवून करावयाची असते.

प्रत्येकजण आपल्या शक्ती प्रमाणे एखादा नियम घेऊन त्याप्रमाणे आचरण करीत असतो. कोणी एक, कोणी दोन, कोणी तीन, कोणी आठ, कोणी महिन्याचे उपोषण, तप करतात.

त्या सर्वांना अनुमोदना सर्व समाज देत असतो. त्यामुळे त्याच्या मनाची इच्छा शक्ती बळावली जाते. इतर जण पण त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे पर्युषणपर्व हे आनंददायी पर्व जैन धर्मात मानले जाते.

ज्याप्रमाणे वर्षाचे 27 नक्षत्रा पैकी नऊ नक्षत्रे कोरडी गेली तर 27-9=0 शिल्लक शून्य होते. त्याप्रमाणे वर्षभरातील या पर्व काळात आपण कांही आराधना केली नाही तर जीवन अर्थशून्य होईल, म्हणून प्रत्येकाने या पर्व काळाचा फायदा घेऊन आपले जीवन कारणी लावावे.

आपण प्रपंचामध्ये रोज कांहीतरी परमेश्‍वराला मागत असतो व तो आपणाला देत असतो, तेव्हा कुठेतरी नको म्हणण्याची बुद्धी दे असे मागावे आणि ती नको ही भावना ज्या पर्वामध्ये निर्माण होते.

आपणास शडरिपुवर विजय मिळविण्याची कला या पर्युषण पर्वा मध्ये शिकायला मिळते म्हणून जैन धर्मामध्ये या पर्वाला अतिशय महत्व आहे.

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted August 24, 2022 12:15 pm 0Likes

    पर्युषण परवाची माहिती डॉक्टर साहेबांनी फारच सुंदर पद्धतीने दिली आहे डॉक्टर साहेबांचा अभ्यास चौफेर आहे
    मिच्छामी दुक्कडम याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे भाषण ऐकले होते
    पण आज डॉक्टर साहेबांच्या मुळे त्याचा अर्थ जास्ती कळला.
    जैन धर्मामध्ये अशा प्रकारचे पर्व आहे की ज्यामध्ये काय वाचा मन यामधून झाले असतील तर क्षमा करा.
    पर्व पाहून ज्ञानात नवीन भर पडली

    आपल्याकडे पूजा झाल्यावर अपराध क्षमा स्तोत्र असते तशी कल्पना जैन धर्मामध्ये पण आहे पण त्यासाठी वेगळे पर्व आहे
    🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment