संत तुकोबा मोठे संत होवून गेले. त्यांनी सर्वसामान्य माणूस व संत यामध्ये काय फरक आहे हे आपल्या अभंगातून स्पष्य केले आहे.
सामान्य माणूस एखादी गोष्ट केली, तिची सर्वत्र वाहवा झाली तर ती गोष्ट मी केली असा सर्वत्र डंका करीत सुटतो. त्याला आपल्या कर्तुत्वावर गर्व होतो.
पण संतमंडळी याचे उलट असतात. त्यांचे हातून एखादे महान कार्य झाले त्याला गवगवा झाला, प्रसिद्धी झाली तरी ती संत मंडळी शांत असतात. या कार्याचे यश ते आपणाकडे घेत नाहीत. ते माझे कर्तुत्व नाही म्हणतात. हे घडविणारा परमेश्वर आहे असे ते म्हणतात.
अशी अनेक उदाहरणे घेवून तुकोबांनी हे लोकांना पटविण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील भाव असा
मी पण सोडा, निगर्वी व्हा : आपले खरे रुप पहा. जे कांही करावयाचे आहे त्याचे चिंतन करा, अभ्यास करा, त्यावर दृढ विश्वास ठेवा, परमेश्वर ते कार्य सिद्धीस नेणार या बद्दल शंका ठेवू नका.
निस्वार्थी वृत्तीने केलेले, तळमळीने, प्रेमाने हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर प्रयत्न करतो.
तुकोबांनी एवढे मोठे अभंगाचे भंडार लोकांना उघडून दिले, पण त्यावर त्यांनी आपला हक्क दाखविला नाही किंवा त्या कर्तुत्वाचा गर्व केला नाही.
ही सर्व परमेश्वराची कृपा अशा भावनेने त्यांनी हा अभंगाचा साठा लोकांना सुपूर्त केला.
प्रपंचात माणसाला पदोपदी आपली प्रगती, संपत्ती, ऐश्वर्य वाढावे अशी अपेक्षा असते व त्याप्रमाणे तो प्रयत्नशील असतो. या प्रयत्नाला जेव्हा यश येते, तेव्हा प्रपंची अहंकारी होतो. हे माझ्या कर्तुत्वाचे फळ म्हणून सर्वत्र टिमकी वाजवतो.
तर संत तुकाराम म्हणतात, परमेश्वरा तुझा दरबार स्वच्छ करण्यासाठी मला तु केरसुणी बनव.
हाच फरक माणसात व संतात आहे. या जगात ज्या ज्या वस्तु गौण मानल्या आहेत, उदा. वहाणा, केरसुणी त्यांच्या रुपातून मला तुझी सेवा करण्याची संधी संत मंडळी परमेश्वराकडे मागत असतात.
अशा संत संगतीमुळे नामदेवांनी आपल्या स्नेही सोबत्यांना विठ्ठलाचे दर्शन घडविले .
संतांना लहान थोर सर्व सारखेच असतात. ते म्हणतात, कष्टकरी, रोजंदार करणारे आहेत, त्यांची जास्त चिकित्सा न करता त्यांचेवर अन्याय न होईल याची काळजी घ्या.
संत नुसते उपदेश करीत नाहीत तर हे सर्व श्रेय परमेेश्वराला देतात. हा त्यांचा मोठेपणा आहे.
प्रपंचात मोठ्यांच्या घरी प्रेतासमोर रडण्यासाठी भाडोत्री माणसे लावली जातात, तेथे जिव्हाळा जपणारी माणसे नसतात.
गाय सुद्धा वनांत चरत असते पण तिचे लक्ष गोठ्यात असणार्या वासराकडे असते. असे हे संत जगाच्या कल्याणासाठी अंगाला विभूती फासून जगात वावरत असतात.
त्यांना जर कोणी विचारले, तुम्ही एवढे कार्य करता अन् श्रेय मात्र परमेश्वराला देता यांत तुम्ही काय साधता?
तुकोबांचे उत्तर फार मार्मिक आहे. ते म्हणतात, गाढवाला गुळाची चव काय? ज्याने परमेश्वराला श्रेय दिले त्याचं समाधान इतरांना काय कळणार? ते स्वत: अनुभवले पाहिजे.
म्हणून तुकोबा म्हणतात, ‘माझीया युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो ।’