मैत्रिचा हप्ता

प्रपंच करायला सुरवात होताच हप्ता हा शब्द कानावर यायला सुरवात होते. प्रपंचात घरापासून हप्त्याला सुरुवात होते. रहाण्यासाठी घर हवे असते. बँकेकडे जा, कर्ज घ्या, हप्ता बांधुन घ्या, दर महिन्याला न चुकता तो हप्ता जमा करा व चैनित रहा.

घराची गरज संपताच गाडीची गरज भासु लागते. परत तेच चक्र, दर महिन्याला गाडीचा हप्ता बँकेकडे सुरु झाला. पण यामुळे जीवन आनंदी झाले.

असे अनेक अनेक हप्ते प्रपंचात मी भरले त्यातून घरात फ्रिज, टि.व्ही., वॉशिंग मशिन आले अशा अनेक वस्तु आल्या. हप्ता भरुन माझी दमछाक होवू लागली. पण घरांत सर्व सुविधा आल्या. त्यामुळे मला व घरांतील सर्वांना आनंद झाला.

हे सर्व प्रपंचातील हप्ते भरत भरत मी आनंदाने प्रपंच करीत आलो. सर्व श्रम विसरुन गेलो. हे कशामुळे तर, एका हप्त्यामुळे .

तेथे मला एक पारमार्थीक हप्ता भेटला, तो होता मैत्रीचा. पण ज्या मित्राचे सोबत राहून मला हा हप्ता दिसला त्याला मी कधीच ओळख दिली नाही. ती ओळख मला प्रपंच्याच्या तिसर्‍या टप्यावर लक्षांत आली, ती होती मैत्रीच्या हप्त्याची.

मैत्री ही पण आयुष्यातील एक गरज असते, ती भागविण्यासाठी आपणाला मैत्रीच्या बँकेकडे जावे लागते. तेथून आपण कर्ज घेतो. पण त्याचा हप्ता भरावयाचे विसरुन जातो. त्यामुळे ते कर्ज व्याजासुद्धा आपले माथेवर चढत जाते.

तेव्हा आपणास त्या बँकेकडून एक स्मरण पत्र येते. बँकेत बोलविले जाते, तेथे आपण हजरी लावतो, गुन्हा कबूल करतो व यापुढे नियमित पणे हप्ता भरण्याचे (एकत्र येण्याचे) लेखी करार पत्र देतो.

तेथे मैत्रीच्या नियमित कर्ज फेडीचा हप्ता चालु होतो. या मैत्रीच्या बँकेत तुम्ही वणवण करीत चालत जाण्याची गरज नाही. मोबाईल घ्या, एक फोन करा, एखाद्या ठिकाणी मित्रांना एकत्र बोलवा. दोन चार महिन्यांनी एकत्र या, गप्पा करा, हसून घ्या, तुमचा आनंद इतरांना वाटा.

इतरांचे दु:खात तुमचा सहभाग दाखवा. त्यामुळे तुमचे जीवनात येणार्‍या कठीण प्रसंगात धीर येईल.

हा मैत्रीचा हप्ता ठराविक अंतराने ठरवून घ्या तो नियमित भरण्याचा प्रयत्न करा. जीवनांत आनंदी आनंद वाटेल.

मैत्रीची मशागत रोपट्या सारखी करावी लागते. रोपट्याप्रमाणे मैत्रीला पण वेळ द्यावा लागतो. मैत्रीचे रोपटे सुकून जाणार नाही हे पहाणे गरजेचे असते.

एकदा सुकून गेलेले मैत्रिचे रोपटे कितीही पाणी घातले तरी ते उभारी घेत नाही. म्हणून सांगतो मैत्रीचा हप्ता नियमित भरा तो हप्ता तुम्हाला हयातीत तर साथ देईलच पण हयातीनंतर ही साथ सोडणार नाही.

तुम्ही कर्जमुक्त व्हाल. आनंदी जीवनासाठी या मैत्रीच्या हप्त्याची गरज आहे.

ती ओळखून प्रत्येकाने त्या हप्त्याची सोय करावी व आनंदात जीवन व्यतीत करावे.

Leave a comment