पत्रं पुष्पं फलं तोय,यो मे भक्त्या प्रयच्छाती|
तदहं भवत्युपहतमश्रामि प्रयतात्मन:॥
या श्लोकात भक्तीने व प्रेमाने सर्व कांही जिंकता येते,अगदी ईश्वर देखील आपलेसे करता येते, कोणाला किती प्रेमाने दिले, देताना देणाराच्या हाताला भक्तीचा ओलावा आहे का?, या साठी दान देताना, दक्षिणा देताना पाणी हातावर घेवून दिली जाते.
तेथे भक्ती असावी लागते. जीवनात पण आपण साधी कर्मे रोज करत असतो, ती करताना परमेश्वर साक्षी ठेवूनच केली तर त्याला जीवनांत किंमत येते, त्या कर्माचे फळ न मागता मिळते.
कर्म करा व त्याचे फळ न राखता ईश्वर अर्पण करा हा राजयोग होय. तो राजयोग कर्म योगाच्या पुढे जातो.
कर्म करा परंतु फळाची अपेक्षा ठेवू नका. या पेक्षा कर्म करा परंतु कर्मे ईश्वराला अर्पण करा.
एका ठिकाणी म्हटले आहे-
रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ।
ते तात्काळीचे सिद्धी पावे ।
कर्ता राम हे असावे.. अभ्यंतरी ॥
याचाच अर्थ असा, एकाकडून कर्म दुसरीकडून भक्ती असा मेळ करुन जीवन सुंदर करीत जायचे. भक्तीने अर्पण केलेली कोणतीही गोष्ट परमेश्वराला प्रियच असते.
किंबहुना
पै भक्ती एकी मी जाणे ।
तेच साचे थोर न म्हणे ।
आम्ही भावाचे पाहुणे.. भलतेया ॥
कर्म करा पण त्यात भक्ती असुद्या, सर्व कर्मे ईश्वर अर्पण करा. तो भाव भक्तीचा भुकेला आहे.