मांदियाळी याचा अर्थ मेळावा. एका विचाराच्या लोकांचा , एका ध्येयाने प्रेरीत झालेल्या सज्जनांचा जमाव, मेळावा असे म्हटले जाते.
प्रपंचात असे अनेक मेळावे आपण घडवून आणतो व त्या मेळाव्याचा आनंद उपभोगतो.
त्याप्रमाणे परमार्थात पण असे मेळावे होतात. तेथे साधू, संत एकत्र येऊन आपली श्रद्धा, भक्ती, प्रेम व्यक्त करतात. हा भक्तांचा साधूसंतांचा मेळावा असतो. तेथे फक्त आस्तिक साधकच येेतात. म्हणून या मेळाव्यास ईश्वर निष्ढांची मांदियाळी म्हटले जाते.
अनेक वर्षापासून अशी ईश्वरनिष्ठ साधकांची मांदियाळी दरवर्षी क्षेत्राचे ठिकाणी जमत असे.
वारीने ही संत-साधक मंडळी क्षेत्राचे ठिकाणी जमत व आपल्या ईष्ट दैवतांचे भजन, किर्तन करीत क्षेत्री पोहचत असत.
तेथे समाज जागृतीचे कार्य होत असे. अशी ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत गोराकुंभार, संत ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज तसेच समर्थ रामदास होत.
अशा या संत मंडळीनी त्या त्या काळात चिंतन करुन आपले कार्य आपले ध्येय निश्चित केले. अज्ञानी जनाला सज्ञान करुन त्यांचे मध्ये चैतन्य निर्माण करण्याचा अटोकाट प्रयत्न केला.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरांचे पसायदान होय. या पसायदानामध्ये परमेश्वराकडे अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वरचेवर एकत्र येवो व धर्माचे आचरण चांगल्या पद्धतीने होवो अशी प्रार्थना केली आहे.
पुढे जावून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे मेळावे झाल्यामुळे जे खरच(दुष्ट) आहेत त्यांची वक्रता दूर होईल. त्यांना सत्कर्माची गोडी लागेल.
सर्व प्राणीमात्रात जीवा भावाची मैत्री जडेल. यासाठी अशा ईश्वरनिष्ठांचे मेळावे जगभर फिरोत. हे मेळावे म्हणजे कल्पतरु, चिंतामणी, सागरातील, अमृतासारखे असोत. त्यामुळे ते तळपत असून लोकांना त्रास देत नाहीत. त्यांचे दूषण कुणाला जाणवत नाही.
असे हे मेळावे या भूमीवर वरचेवर भेटत गेल्यामुळे अशिक्षितांचे अज्ञान दूर होईल. जगामध्ये मानवता धर्माचा तळपता सुर्योदय होईल. त्यामुळे मानव जे जे इच्छिल ते ते त्याला प्राप्त होईल.
याचा अर्थ तिन्ही लोकांमध्ये सुख, शांतीे, आनंद भरुन राहिल. तिन्ही लोकांमध्ये परमेश्वराची भक्ती पसरेल. त्या परमेश्वराचे भजन पूजन होत राहील.
थोडक्यात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमल्यावर
1. तमोगगुणातून सत्व गुणाकडे
2. सत्वगुणातून स्वधर्माकडे
3. स्वधर्मातून सर्व सुखाकडे आणि
4. सर्व सुखातून पूर्णतेकडे आणि पूर्णता म्हणजे आदिपुरुषांची भक्ती.
असा हा परमेश्वर प्राप्तीचा चढता मार्ग आहे.
भागवत धर्म हा धर्माचा पायाच आहे. आणि तो कळसपण आहे. हे दाखविण्याचे प्रयोजन ईश्वर निष्ठांची मांदियाळी करते.
त्या मांदियाळीस मी भक्तीने प्रेमाने वंदन करतो.