पूर्वी देेवाची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणी देखील न घेणारी माणसे होती.
त्यांची आठवण अशी – भल्या पहाटे उठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वयंपाक घरातील कामे, पाणी भरणे , लहान मुलांकडे लक्ष देणे या कामात मग्न असतं. अशा वेळी पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणाची स्वच्छता करणे, चूल पेटविणे, बागेला पाणी देणे, गोठा सफाई करणे , दुधाच्या धारा काढणे ही कामे करीत असत.
सकाळची सर्व आन्हिक कर्म उरकून सुचिर्भूत होवून घरातील यजमान पूजेसाठी फुले काढायला बागेत जात. उगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत अनवाणी पायांनी, रंगबिरंगी फुलांची शोभा निहाळतं, पाना फुलांशी हितगुज करीत. निसर्गाचे अद्भुत स्वरूप मनांत साठवतं मनाला अल्हाददायक ठरणारा एक आनंददायी अनुभव.
फुले घेवून देवळात आल्यावर सर्व देव स्वत: स्वच्छ घासलेल्या ताम्हणात काढून देवरायाची स्वच्छता करत, गरम पाण्याने अंघोळ घालून, त्यांना लहान बाळाच्या ममतेने (भक्तीने) स्वच्छ करुन परत जागचे जागेवर स्थानापन्न करायचे. एकाग्रतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध उगाळतात तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव होय.
खर्या भक्तीभावनेत तल्लीन होवून पूजा करताना तो आहे माझ्या पाठीशी, हे ही दिवस जातील, तो समर्थ आहे, मी कशाला काळजी करु, त्याला कांही मागू असे विश्वासाने म्हणणारा डोळ्या समोर उभा रहातो. चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धुपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफील वाटत असे.
ही पूजा केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं सुगंधीत देवरायाचं रुप डोळे भरुन मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखविल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियाद्वारे केली जाणारी साधनाच जणू. तुमचं मनं जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीर गंभीरपणे म्हणली जाणारी स्तोत्र होय .
खरोखरचं तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी, सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवनारी, तुम्हाला जास्त प्रेमळ, करुणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी, मी तुझ्या पाठीशी आहे सर्व काही उत्तमच होईल, असा भक्कम विश्वास देवू करणारी तुमच्यातील अहं भाव विसरायला लावणारी, अशी ही रोजची पूजा.
ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का?
या वेळेस अंतर्मुख होऊन, मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का?
यांत अमुक फूल आहे किंवा नाही म्हणून, चंदनाचा गंध हवा तसा किंवा हवा तितका नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून, तुम्हाला राग येत असेल तर, किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनांत बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर, मंडळी या पूजेचा काही उपयोग होईल का?
पूजा ही कुणा बाहेरच्या देवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वत:ला प्रसन्न ठेवण्यासांठी आहे.
दिवसाची सुरवात सकारात्मक उर्जेने आणि उत्साहाने करायचा तो एक सहज सोपा आणि सुंदर मार्ग आहे.