चातुर्मास एक चिंतन

बळीचे महिने बारा. काळ तीन – उन्हाळा, हिवाळा, पावसाळा.

अशा या तीन काळामध्ये माणसाची दिनचर्या कशी असावी याचे चिंतन म्हणजे चातुर्मास चिंतन होय.

उन्हाळा म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे. रखरखते ऊन, कासावीस धरती, सर्वत्र धगधग असते.

मुलांच्या परीक्षा, उन्हाळ्याची सुट्टी, सहलीचे नियोजन हे सर्व उन्हाळ्यात केले जाते. फळाचा राजा आंबा. त्याचे आगमन, लोणच्याची तयारी, वर्षभराची लोणची भरुन ठेवणे ही सर्व तयारी उन्हाळ्यात करावी लागते.

तसेच धान्याचे नियोजन, ऊन देणे, निर्जंतूक करणे, भरुन ठेवणे ही पण कामे उन्हाळ्यातच करावी लागतात.

याच काळात निसर्ग ढगांची जमवा जमव करुन पाऊस पाडण्याची तयारी करीत असतो व मानव त्या पावसापासून सुरक्षीत रहाण्यासाठी घराची डागडुजी करीत असतो.

संक्रांतीपासून सणावारांना सुरवात होते. ही झाली उन्हाळा व त्यातील चार महिन्यांची कथा.

बोलता बोलता जून महिन्याची चाहूल लागते,. मान्सून 7 जुनला हजरी लावतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने पावसाळा म्हणून समजले जातात.

शेतकरी रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन आभाळाकडे डोळे लाऊन बसलेला असतो.

एक दोन पाऊस पडून गेले की, त्याच्या जीवात जीव येतो. त्याची शेतीची पेरणी वगैरे कामे सुरु होतात. तेथे पावसाळा सुरु होतो. हा दुसरा चातुर्मास होय.

याची तयारी शेतकर्‍याप्रमाणे संत महंत, वारकरी करीत असतात. शेतीतील कामे आटोपून प्रपंचातील सर्व कामे यथाशक्ती पूर्ण करुन पांडुरंगाचे भेटीस जाण्यासाठी वारकरी सज्ज होतो. जिकडे तिकडे वारीचे वातावरण दिसते.

या काळात प्रापंचिक प्रपंचातून विश्रांतीसाठी परमात्म्याच्या संगतीत जाण्याचा प्रयत्न करतो. तर साधु, साध्वी, वारकरी एका ठिकाणी स्थिर राहून लोकजागृतीचे काम करीत असतात.

साधु संत विहारात होणारी प्राण्यांची हत्या, कोवळे गवतावर होणारा प्रवास टाळण्यासाठी एका ठिकाणी थांबून आपली तपश्‍चर्या, जनजागृती ही कामे करीत असतात.

या चार महिन्यांत संस्काराची बीजे साधकाच्या ह्रदयात पेरली जातात. एका ठिकाणी राहून जप, तप, क्रिया, कर्म या गोष्टी संतांचे संगतीत केल्या जातात.

या चातुर्मासात जैन धर्मामध्ये असलेली तत्वे वारंवार लोकांना सांगितली जातात व ती त्यांच्या क्रियेतून मनांत प्रतिबिंबीत केली जातात. त्यामुळे पावसाळा हा काळ जैन धर्मात सर्वात महत्वाचा काळ समजला जातो.

त्याचे चिंतन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

आता उन्हाळा, पावसाळा या दोन चातुर्मासाचा विचार केल्यानंतर आपण येतो तो हिवाळा या काळाकडे.

ऊन-पावसाच्या खेळानंतर बेजार झालेली धरणी आता आनंदी दिसू लागते. अल्हाददायक वातावरण गुलाबी थंडी त्याच बरोबर शेतात उभी असलेली धान्याची कोवळी कणसे आपणाला बोलवित असतात.

हुरडा पार्ट्या, सहभोजन सहली या गोष्टी सुरु होतात. तर हवेत असणार्‍या गारठ्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी स्वेटर्स, रजई, कानटोपी वगैरे बाहेर पडतात.

असा हा अल्हाददायक हिवाळा राहून राहून मनाला आनंद देत असतो.

असे हे तीन चातुर्मास मानवी व पशुप्राणी जीवनांत आनंदाची पेरणी करुन जातात.

आपण मात्र त्याकडे बारकाईने लक्ष देत नाही.

या निमित्ताने चातुर्मास चिंतन सर्व जेष्ठांचे समवेत केले.
आनंद घ्या.. आनंदी जीवन जगा..!

Leave a comment