चौकट आकसत चाललीय

पुर्वीपासून आम्हाला सवय होती, नवे कपडे शिवून आले की पाण्यात भिजत घालायचे व वाळल्यानंतर ते वापरण्यास घ्यायचे.

एक दिवस असेच माझे नवे कपडे शिवून आले व ते पाण्यातून काढत वाळवून माझ्या समोर आले. शाळेत कार्यक्रम होता. म्हणून माझे मित्र मला बोलविण्यासाठी आले. मी घाई गडबडीत कपडे घालण्यास सुरवात केली. पहातो तो काय, मित्र हसून हसून माझ्याकडे पहात होते.

कारण नवीन कपडे अंगात शिरत नव्हते. कापड आकसल्यामुळे कपड्याचा आकार पण आखडला होता. तेव्हा त्या आकसलेल्या कपड्याकडे पाहून मला खूप खूप राग आला.

माझा राग पाहून माझा मित्र म्हणाला, मित्रा यात रागावण्यासारखे काय आहे?

अरे आता घराच्या चौकटीसुद्धा आकसायला लागल्या आहेत.

कपड्याचे काय घेऊन बसलास त्याने त्याच्या डोक्याला झालेली जखम दाखविली व म्हणाला आकसलेल्या चौकटीमुळे मला एवढी जखम झाली आहे.

मी शांतपणे घराच्या चौकटीकडे पहात राहिलो…

या सर्व उद्योगात माझ्या डोळ्यासमोर आली ती घराची चौकट.

घर बांधताना साधारण माणसाची उंची जाडी याचा विचार करुन सुतार त्या घराची चौकट तयार करतो. ज्यामुळे माणसाला ये-जा करताना कुठे इजा होणार नाही.

पण या कालचक्रात माणसाची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढत गेली. सात फुटी माणूस सहा फुटी चौकटीतून आत येणे कठीण होवू लागले.

पण माणसाला वाटू लागले की, मुद्दाम हे षडयंत्र रचले जात आहे, मला त्रास व्हावा म्हणून.

मग त्या माणसाने घराकडे येणेच सोडून दिले.

येथे घराची चौकट आकासली, खुजी झाली व अहंकाररुपी मानव त्या खुजा चौकटीतून घरात येईनासा झाला.

वैभवाने श्रीमंत झालेल्या माणसाला या चौकटीचा राग येवू लागला, प्रपंचात दुही माजली.

एका बाजुला अहंकार तो माणसाला घरात येऊ देईना व दुसर्‍या बाजुला असाह्यता, जी माणसाला बाहेर पडू देईना.

मी मात्र उंबरठ्यावर ठाण मांडून बसलो होतो. कुणाची कशी समजूत काढावी हे समजत नव्हते. तेवढ्यात गावात एक साधु आले होते, त्यांना आहार घेण्यासाठी शेजार-पाजारी आमंत्रण दिले होते. मी पण त्यांना आमंत्रित करण्यासाठी गेलो. तेथे गेल्यावर मी त्यांचे दर्शन घेतले व विनम्रपणे त्यांना आहारासाठी येण्याचे आमंत्रण दिले.

साधु महाराज उंच पुरे होते. त्यांची शरीर यष्टीपण चांगली होती.

मला प्रश्‍न पडला की आपले घर एवढे खुजे आहे की साधु महाराज कसे येतील?

पण कुतुहल म्हणून मी लांबूनच पहात राहिलो. साधू महाराज घरापाशी आले, त्यांनी नमस्कार केला. थोडे खाली वाकून घरात प्रवेश केला व आहार ग्रहण केला.

मला तेथे आखडलेल्या चौकटीचे रहस्य खुले झाले.

प्रपंचात आपण अहंकारामुळे स्वत:ला इतके मोठे करुन टाकतो की, कुणापुढे वाकण्याची तयारी आपली नसते, त्यामुळे आपणाला घराच्या चौकटीचे आकसलेल्या वाटतात.

पण जे साधू संत असतात, विवेकी असतात ते विवेक जागृत करुन अहंकार रुपी श्रीमंतीला बाजूला सारुन नम्रतेने घरात प्रवेश करतात व तो प्रवेश सर्वांना आनंद, स्वास्थ्य, शांतता देणारा ठरतो.

जीवनात माणसाने नम्रता, शालीनता स्विकारली पाहिजे. तर त्यांचे जीवन आनंदी होईल.

जमवून घेणे, बदल हे स्विकारले पाहिजेत. तरच जीवनाची गाडी डोंगर दरीतून आखडलेल्या चौकटीतून सुरक्षीतपणे बाहेर पडेल. परमार्थात पण मंदीराची चौकट अतिशय लहान ठेवलेली असते.

जसे देऊर येथील मुदाई देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्ताला खाली वाकून मंदीरात प्रवेश घ्यावा लागतो.

परमेश्‍वराचे दर्शन घेताना सुद्धा आपण नम्रता पाळतो, मग सर्वत्र भरुन राहिलेल्य भगवंतांचे दर्शन आपण नम्र होवून का घेऊ नये?

तेव्हा जेष्ठ नागरिक जे परमेश्‍वर म्हणून आपणासमोर आहेत, त्यांना नम्रपणे अभिवादन केले तर त्यांचे जवळ असलेल्या भगवंताचे दर्शन ते तुम्हाला देतील.

तसा प्रयत्न करा…

Leave a comment