प्रत्येक गोष्टीमध्ये विशिष्ठ शक्ति सामावलेली असते.
तेव्हा भक्ति म्हणजे प्रेम यामध्ये काय शक्ति सामावलेली आहे ते आपण पाहु या.
भक्ती म्हणजे प्रेम, प्रेमाला साधनेची जशी साथ मिळेल तसे भाव उत्पन्न होतील व ते भाव आपले अस्तित्व दाखवतील.
ज्यावेळी एखाद्याला आपण प्रेमाने जेवायला घालतो तेव्हा ते जेवण नसते, तो प्रसाद असतो. तो प्रसाद परमेश्वराला अर्पण करुन आपण ग्रहण केला की त्यातून परमेश्वराची भक्ती जन्म घेते.
हीच भक्ती जेव्हा पाण्याची संगत करते, त्यावेळी ते पाणी अमृतमय होते.तहानलेल्याला प्रेमाने दिलेले घोटभर पाणी अमृतमय होते.
ज्यावेळी आपण एका ठिकाणहुन दुसर्या ठिकाणी प्रवास करतो. त्या प्रवासात प्रेम भरतो तर तो प्रवास आपणास तिर्थक्षेत्रात नेवून ठेवतो.
एखादा साधक एखाद्याचे गुणगान करतो. त्यातील त्याची भक्ती त्याला किर्तनकार बनविते व ते गुणगान म्हणजे किर्तन होते.
अशा प्रकारे हीच भक्ती जेव्हा घराचा आधार घेते. तेव्हा घर हे मंदीर होवून जाते.
भक्तीपूर्वक प्रेमाने कोणतेही काम करीत गेलो तर ते काम सेवा या सदरात मोडते. ते सत्कर्म होते.
ज्यावेळी ही सर्व कामे मनुष्य भक्तीने करतो तेव्हा तो मानव होतो. तेव्हा या भक्तीच्या शक्तीने आपणास मानव व्हायचे आहे.
आज मानवाची जगाला गरज आहे.