भाग्योदय ही प्रारब्धाची किमया असते. त्यालाच आपण नशिब असे ही म्हणतो.
माणूस आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करीत असतो, पण त्याला ती गोष्ट साध्य होत नाही. पण जो नाराज न होता सतत पुढे पुढे प्रयत्न करीत रहातो व यशाची पातळी न कळत गाठतो तेव्हा लोक म्हणतात. त्याचा भाग्योदय झाला.
भाग्योदय हा हळूहळू प्रगती पथावर साधकाला नेऊन ठेवतो. आपण सूर्योदय पहातो. सूर्योदय एकदम होत नाही. त्याची आपणाला वाट पहावी लागते व नंतर तो कोवळ्या कोवळ्या किरणांची पृथ्वीवर अवतरतो. तेथे आपण म्हणतो सूर्योदय झाला.
सूर्योदयानंतर माणसे जागी होतात. अज्ञानाचे अंध:कारातून ज्ञानाचे प्रकाशाकडे चालू लागतात. सूर्योदयाने सामान्य जनांचे डोळे दिपले जातात. सर्व जण उगवत्या सूर्यनारायणाला वंदन करतात.
जीवनांत भाग्योदयाला ही अशीच किंमत आहे. नेहमीच्या चालीने माणूस जीवन जगत असतो. काबाडकष्ट करीत असतो. प्रयत्नाची शिकस्त करतो. पण त्याला यश लवकर मिळत नाही. एक दिवस असा उगवतो त्या दिवशी त्याला लॉटरी लागते. विद्यापिठाच्या अंतिम परीक्षेत तो पास होतो. त्याला मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळते. सर्व घराचे चित्र बदलून जाते.
आई-वडीलांना वाटते मुलाने आपल्या कष्टाचे चिज केले. ही अवस्था पाहून शेजारपाजारी म्हणतात. या घराचा भाग्योदय झाला.
आता या घरातून चांगले विचार संस्कार बाहेर पडतील. त्याप्रमाणे भाग्योदय झालेली व्यक्ती परमेश्वराने आपल्या झोळीत टाकलेल्या यशाला स्मरुन पुढील वाटचाल सुरु करते.
हे विचार, हे आचार मनांत येणे ही गोष्ट पण भाग्योदया शिवाय होत नाही.
आपल्या भाग्योदयाकडे लक्ष ठेवा…