काही बाहेर पडल्याशिवाय कांही आत येत नाही, कांही पदरी पडत नाही.
अज्ञान बाहेर पडल्या शिवाय ज्ञान आत येत नाही, हा साधारण संकेत आहे.
जीवनात घरात बसून कांही गोष्टी कळत नाहीत, त्यासाठी घर सोडून बाहेर पडावे लागते.
स्त्रीला माहेर सोडून सासरी जावे लागते तेव्हा तिला तिथल्या गोष्टींचे ज्ञान होते.
समाजात कसे रहावयाचे याचे ज्ञान घरातून बाहेर पडल्याशिवाय कळत नाही.
शिक्षणपण घरांत बसून मिळत नाही, तर त्यासाठी घरातून त्याला बहिर्गमन करावे लागते. तेथे गुरुग्रही आगमन करावे लागते. मगच ज्ञानाची पोथडी त्याला सापडते.
सृष्टीमध्ये सुद्धा दिव्याचा असण्याने अज्ञानाचे (अंध:काराचे) निर्गमन होते. ज्ञानाचा प्रकाश पसरत जातो.
अंधार्या रात्रीच्या निर्गमानंतर सूर्याचे आगमन होते व पृथ्वीतलावर सूर्य किरणांचे साम्राज्य पसरते.
येथे एकाचे आगमन व दूसर्याचे निर्गमन होत असते.
पण त्यांचे मध्ये कधी विपरीत माप दिसत नाही.
प्रत्येकजण आपले काम झाले की तेथून निवृत्ती घेतो व दूसर्याला त्या ठिकाणी येण्याचे निमंत्रण देतो.
प्रपंचातपण अशी ज्ञानाची चाहूल लागताच अज्ञान, संघर्ष दूर निघून जातात व शांती सुख लाभते.
एकावेळी हे दोघे एका म्यानात राहू शकत नाहीत.
झर्याचे पाणी उपसल्याशिवाय स्वच्छ पाण्याचा झरा सापडत नाही.
दु:ख सोसल्याशिवाय सुखाचा आनंद उपभोगता येत नाही.
तेव्हा दु:खाला कुरवाळत घरात बसू नका. त्याला निरोप द्या. मागोमाग सुखाचा डबा येत जाईल. जीवन आनंदी होत जाईल.
जीवनांत कांहीतरी दिल्याशिवाय कोणतीही गोेष्ट मिळत नाही.
एका हाताने द्या व दुसर्या हाताने त्याचे फळ घ्या.
परमार्थात पण असेच आहे, वर्षभर आपण घरात बसून, पारायणे करुन, कथा-कीर्तने ऐकून जे मिळवितो ते वारीच्या रुपाने घरातून बाहेर पडल्याशिवाय पांडुरंगाचे दर्शन आपणास होत नाही. पांडुरंगाचे आगमन आपल्या ह्रदयात होत नाही.
ज्या वेळी साधक बाह्य गोष्टीची ओढ कमी कमी करीत जातो, तसे तसे त्याचे चित्त अंतर्मनात आत आंत जात जाते.
बाह्य सुखाच्या निवृत्ती नंतर अंतर्मनाची शांती ह्रदयात प्रवेश करते, असे हे बहिर्मन व अंतर्मन याचे रहाट गाडगे सतत चालू आहे.
त्या पोहर्यातून आपणास प्रपंचाची शेती फुलवायची आहे.
तेव्हा काम, क्रोध, मोह, माया यांचे पाणी आपण बाहेर काढू या. शांती समाधानाची शेती फुलवू या.
उन्हाच्या झळा थोपविण्यासाठी झळा थोपविणारा पडदा आपण लावतो, तसे प्रपंचातील दु:ख सोसण्यासाठी आसक्तीचा पडदा लावून पहा व आनंद निर्माण करु या.
यातून संतुलित वातावरण साधेल, संघर्ष टळतील.
एका ठिकाणी कोणी फार काळ चिटकून बसू नये.
प्रपंचात पण थोडे बाहेर पडणे व मधून मधून त्यात डोकावणे यालाच बहिर्गमन व आगमन म्हणतात.