आपला प्रवास खूपच छोटा आहे

पुणे  स्टेशनवर मी लोणावळा जाणेसाठी तिकीट घेण्यासाठी गेलो. तिकीट खिडकी समोर भली मोठी रांग दिसत होती. ती रांग पाहून मी हताश झालो. म्हटलं मला तर लोणावळ्याला जायचं आहे. माझा प्रवास तर खुप छोटा आहे.

मग मी एवढ्या मोठ्या रांगेत का म्हणून उभे रहायचं. मला काही सुचेना. मी कुतूहल म्हणून पुढे असणार्‍या व्यक्तीला तुम्हाला कुठे जायचे विचारले. तो म्हणाला मला दिल्लीला जायचे आहे. त्याचा प्रवास फा र पुढचा होता. तरी त्याला ही रांगेत उभे रहावेच लागले होते.

तेव्हा मागील माणसाची चुळबूळ पाहून मी त्याला विचारले तुम्हाला कुठे जायचे तेव्हा त्याने मला कोल्हापूरला जायचे असे सांगितले. तेव्हा मी त्याला सांगितले तुझा प्रवास या रांगेत उभा राहून होणार नाही. तुला शेजारी असलेल्या रांगेत जावे लागेल. तेथून तुला कोल्हापूरचे तिकीट मिळेल. त्याला त्याची चूक लक्षात आली व त्याने आपली रांग बदलली व थोड्याच वेळात तिकीट घेऊन तो कोल्हापूरच्या गाडीत आसनस्थ झाला. त्याचा प्रवास सुरु झाला.

मी याच विचारात मग्न झालो. प्रवास तर सर्वांना करावयाचा आहे, पण या जीवनाच्या प्रवासात सुख समाधान लाभावे असे वाटत असेल तर तुम्ही चौकस बनले पाहिजे. डोळसपणाने तिकीटाची खिडकी शोधली पाहिजे व तिकीट घेऊन प्रवासाची सुरवात केली पाहिजे.

वेळ दवडू नये कारण गाडी वेळेवर सुटते – आपला प्रवास सुखकारक होण्यासाठी वेळेचे बंधन आपण पाळले पाहिजे.

प्रवासात रेल्वेमध्ये खूप गर्दी असते. अनेक लोक नको तेवढे सामान घेवून प्रवास करीत असतात. त्यांचा आपणाला राग येतो. पण आपण प्रवास करणार असतो. आपल्याला प्रवास आनंदात करावयाचा असतो. प्रवास थोडा असतो, म्हणून आपण तो राग तेथेच गिळतो व आपला प्रवास आनंदात करतो.

जीवनाच्या प्रवासात तुम्हाला अनेक लोक भेटतील त्रास देतील, धक्का बुक्की करतील. पण हे सर्व आपण सोसतो व राग, द्वेष, मत्सर गिळून प्रवास करतो. कारण आपल्याला पुढच्या स्टेशनवर उतरायचे असते.

आपला प्रवास छोटा असतो, त्यामुळे आपणाला राग द्वेष, मत्सर गिळणे भाग असते.

प्रवास छोटा असतो,

जीवनाचे पण असेच आहे. आपण जन्माला आल्यापासून आपला प्रवास सुरु होतो, तो कुठे संपणार याची आपणाला कल्पना नसते. एखाद्याला पुढच्याच स्टेशनवर उतरावयाचे असते. तो गर्दीतून वाट काढत गाडीतून खाली उतरत असतो व खाली उतरल्यावर सुटकेचा श्वास शकतो.

कारण त्याचा छोटासा प्रवास संपलेला असतो.

मोठमोठे राजकारणी झाले त्यांनी गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा प्रवास केला असतो. त्यांना विचारले तर त्यांनी उत्तर दिले आम्ही एकदम एवढा प्रवास केला नाही. तर टप्याटप्याने प्रवास करीत आम्ही दिल्ली गाठली.

तेव्हा लक्षात आले प्रवास मोठा असला तरी टप्याटप्याने केला तर तो सुखकारक होतो.

जीवनाचा प्रवास सुखकारक, अल्हाददायक होण्यासाठी जीवनाच्या गाडीचे आरक्षण करा आपले आसन निश्‍चित करा. त्याचे चिंतन करा घाई गडबडीत प्रवासात बाहेर पडू नका इतरांच्या अडचणीचा विचार करा. त्यांना जमलेतर मदत करा. कारण हा जीवनाचा प्रवास फार छोटा आहे तो आनंदात पार करावयाचा आहे.

Leave a comment