गुणगौरव करणे म्हणजे आरती होय.
प्रपंचात व परमार्थात जो करता करविता असतो, त्याची सर्वजण आरती करतात, त्याचे गुणगौरव करतात, त्याला भक्तीने आळवितात. या सर्व क्रियेला आरती म्हणतात.
परमार्थात परमेश्वर हा कोणीतरी आहे, जो सर्वांचे पालन पोषण व अनित्य,अनिष्ठ गोष्टींचे संहारण करणारा आहे.
त्याची आपण भक्ती करतो, त्याचे गुण गातो, सर्वांना त्याची महती समजावतो.
हे काम परमेश्वराचे आरतीतून होते, ही गोष्ट सर्व धर्मांनी मान्य केली आहे, म्हणून प्रत्येक धर्मात आरतीला स्थान आहे.
आरती म्हणजे एका थाळीत एक निरंजन प्रज्वलीत करुन घेणे. ज्यामुळे आपल्या भोवती जो अज्ञानाचा पगडा पसरलेला असतो तो दूर केला जातो व ज्ञानवंत परमेश्वराचे दर्शन त्या प्रकाशात होते.
त्याच वेळी घंटा नाद केला जातो. त्या नादात वातावरणात कांही लहरी उत्पन्न होतात, त्या लहरीमुळे तेथे उपस्थित असलेल्या स्त्री-पुरुषामध्ये (ह्रदयात) परमेश्वराची थोरवी साठविली जाते. सर्वत्र कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो.
कांही धर्मामध्ये प्रात:काली हा भाव उत्पन्न व्हावा अशी शिकवण दिली जाते, त्याला काकड आरती म्हणतात. थंडीने काकडलेला माणूस जसा उबदार पांघरुणाची अपेक्षा ठेवतो तसा प्रपंचात उलथापालथ होत असलेला माणूस या काकड आरतीमध्ये परमेश्वराला मदतीची साद घालतो.
आरती एक दिव्याची (एक ज्योतीची) असते. तिला नामणदिवा म्हटले जाते. सर्वच एकच परमेश्वर आहे. हे या नामनदिव्याने निर्देशीत होते.
पंचारती : पांच दिव्याची आरती ज्या परमेश्वराने मद, मोह, मत्सर, राग, लोभ यावर विजय मिळविला आहे. अशा परमेश्वराची ही आरती असते.
तिसरी आरती 108 दिव्याची महाआरती होय. परमेश्वराचे 108 गुण सांगितले आहेत. त्यामुळे त्यांना परमेश्वरपद प्राप्त झाले त्या गुणांचे आपल्यामध्ये परीवर्तन व्हावे, यासाठी ही 108 दिव्यांची महाआरती केली जाते.
गोंदावले येथे ब्रम्हचैतन्य महाराज श्रीराम जयराम जय जय राम असा जप करीत दुपारचे प्रसाद ग्रहणापुर्वी रामाची आरती करतात. तशी आरती सकाळ-सायंकाळ चालू आहे.
सायंकाळी पुन्हा दिवसभरातील आपली विहित कर्मे झाल्यावर ती पुन्हा परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आरती केली जाते.
या आरती मधूुन मन:स्वास्थ्य उत्पन्न होते. ह्रदय परीवर्तन होते. प्रसन्न मनांतून ऋद्धीसिद्धी प्राप्त होतात.
आरती हा एक मोठा संस्कार आहे. त्यानिमित्त घरातील लहान थोर एकत्र येतात व तेथून आनंदी जगण्याची उर्जा घेवून जातात.
तेव्हा प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी सगुण किंवा निर्गुणाची आरती करावी.
गुणानुराग वृत्ती आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा, ही भावना ठेवून आरती हे चिंतन सर्व बंधू भगिनिंना समर्पित करतो.
1 Comment
सो. शिला केतकर
खरोखरच आरती साठी घरातील सर्व एकत्र येतात आरती चा मोठा प्रभाव आहे दिवसभरात एकमेकांचा मेळ नसणारी माणसे आरती च्या निमित्ताने एकत्र येतात
भगवंतांना आर्ततेने हाक मारण्याची ताकद आरती तच आहे भगवंत यावेळी तेथे हजर असतात
एक दिव्याची आरती तसेच५ दिव्यांची १०८ दिव्यांची आरती हे सर्व प्रकार आणि संकल्पना आवडल्या
परमेश्वराला सुद्धा स्तुती आणि गुण आवडतात आरतीला तो पण हजर असतो
राम कृष्ण हरी🙏