जीवन म्हणजे पाणी.
पाणी ज्याप्रमाणे निर्मळ, स्वच्छ, तृष्णा शामक असते तसे आपले आयुष्य निर्मळ, स्वच्छ, आनंदी सर्वांना उर्जा देणारे असावे. ते सर्वदूर मिळून, मिसळून रहाणारे असावे. ते जीवन एकलकोंडे नसावे. सहजीवन म्हणजे निर्मळ सर्वांसमवेत असलेले जीवन, एकत्र कुटुंब पद्धती – आनंदी परीवार.
आपण जीवन व्यतीत करीत असताना कुणाचा ना कुणाचा सहवास घेतच असतो. तो सहवास कधी प्रारब्धाने लाभतो तर कधी कर्माने लाभतो. प्रपंचात पण सहवासाशिवाय जगणे अशक्य होते, मनुष्य सतत कुणाचा न कुणाचा सहवास शोधतच असतो.
बालपणात त्याला माता-पिता गुरुजन यांचा सहवास लाभतो. पुढे शाळेत मित्रांचा सहवास लाभतो. त्याचे पुढे लग्न होते तेथे त्याचा पत्नीबरोबर सहवास चालू होतो.
जशी जशी जबाबदारी वाढते तस तसी सहवास गावात राजकारणात, समाजकारणात वाढत जातो असा सहवास तो सोडू शकत नाही. असा सहवास त्याला शांती सुख देऊ शकत नाही. अश्या अडचणीच्या वेळी त्याच्या मनांत चिंतन चालू होते. तो विचार करु लागतो, काय करावे ?
सहवास करावा तर दु:ख होते, शांती जाते. सहवास नसावा तर एकल कोंडे जीवन छळू लागते.
अशा वेळी चिंतनात त्याचे लक्षात येते. सहवास ठेवा पण त्यावरची आसक्ती कमी करा. सहवास हे तुमचे ध्येय नाही, ते ध्येयप्राप्तीचे साधन आहे. साधनाला चिटकून राहू नका तेथून कुणाला न दुखविता बाजूला व्हा. कुठेही अतिपरीचयात अवज्ञा होवू देऊ नका.
साधे दुधाचे उदाहरण घ्या दूध भांड्यात घेतले, गॅसवर अग्नीच्या सहवासात ठेवले तर तापण्या एवढाचा अग्नीचा सहवास पुरेसा असतो. पण न कळत आपण तो सहवास दूर केला नाही तर दूध ऊतू जाते व सर्व श्रम व्यर्थ होतात.
पुढे ते दुध तसेच ठेवले तर नासून जाते तेव्हा ते टिकावे यासाठी फ्रिजचा सहवास द्यावा लागतो. त्याच दुधाचा दह्या बरोबर (विरजणा बरोबर) सहवास केला तर दुधाचे दह्यात रुपांतर होते ते स्वादिष्ट दही. आपण केशर, वेलची घालून श्रीखंड करुन स्वाद घेतो.
ते लोणी पण किती दिवस टिकते? त्याला पण घाई असते. ते लोणी अग्नीपाशी सहवास करते व त्यातून तुपाची उत्पत्ती होते. असे रवाळ तूप जेवणाचा स्वाद वाढविते. अन्नाला परब्रम्ह बनविते. अशा प्रकारे एक वस्तु पण निरनिराळ्या सहवासात गेली असता काय किमया करते हे येथे ध्यानांत येते.
मग मनुष्य जन्म लाभलेल्या मानवाने कोणतीही गोष्ट करावयाची मनांत आणली तर ती कशी सहजसाध्य होवू शकते याचा विचार करावा.
सृष्टीमध्ये सर्व पंच महाभूते आहेत. सर्व जनता पृथ्वीवर वास करीत आहे. उत्पत्ती क्षणो क्षणी होत आहे. अशा वेळी याच जनामधून चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन चांगले उद्दिष्ट आपण कां साध्य करु नये ?
सहजीवन लाभणे आपल्या हाती आहे. आपण आपल्यामध्ये सामुहिक जीवन जगण्याची आवड निर्माण केली पाहिजे. एकलकोंडा स्वभाव सोडला पाहिजे. वेळ येताच ज्याच्या सानिध्यात आपण आहोत ते सोडून पुढे संधी दिसताच दौड करावयाची असते.
सानिध्य सोडून आनंदाने तेथून प्रयाण करावयाचे असते. सहजीवन ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे.
गोड बोला चांगला विचार मनांत ठेवा, खाणेवर तसेच बोलण्यावर ताबा ठेवा. इतरांच्या चांगल्या गुणांचा अनुमोदना करा व सहजीवनाचा आनंद लुटा.
जीवन फार अनमोल आहे. त्याची किंमत ओळखा. ते एकट्याने जगु नका. सहजीवनाचे कौशल्य शिका.
जेष्ठ नागरिकांनी प्रपंचात एकटे राहू नका. गप्पा गोष्टी करा. हसून खेळून जीवन जगा. आपल्या बरोबर इतरांना आनंदी समाधानी करण्याचा प्रयत्न करा.