अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करीत जाणे. ध्येय निश्चिती करुन त्या गोष्टीचा पाठपुरावा करणे. योगक्षेम म्हणजे प्रकृतीचे स्वास्थ, स्वास्थ्याची विचारपुस करणे.
योग हा एक प्रकारचा यज्ञ(प्रयत्न) होय. या यज्ञात आपणाला घातक असणार्या प्रकृतीला अपाय करणार्या गोष्टीचे हवन करावयाचे असते.
त्या अपायकारक गोष्टींचा अभ्यास मनांत चिंतन मनन, मौन, साधून करावयाचा असतो.
प्रपंचात व परमार्थात या योगाभ्यासाची फार गरज असते.
प्रपंचात आपले ध्येय निश्चिती होते व आपण ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने त्या ध्येयाचा अभ्यास करीत असतो.
या योगाभ्यासातून मनाची न्यूनता काढून टाकली जाते. अभ्यासाचे जसे काही भौतिक नियम असतात, तसे योगाभ्यासात पण कांही मानसिक नियम सांगितले आहेत. हे नियम मोडले की त्याची शिक्षा होणारच.
आपला विश्वास असो अगर नसो हे नियम आपले कार्य करीतच रहातात. जसे तुम्ही आगीत हात घातला तर हात भाजणारच हा अलिखीत नियम आहे. तेव्हा निसर्ग नियमाची प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे.
निसर्गात कोणत्याही भौतिक वस्तुची निर्मिती होण्या अगोदर त्या वस्तुची वैचारिक स्थरावर मेंदूत निर्मिती होते. नंतर ती वस्तू आपले स्वरुप धारण करते.
जसे जग दिसते तसे नसते. याचाच अर्थ असा कि जग जसे दिसते तसे तुमचे मन विचार करते.
तेव्हा विचार करणे हे महत्वाचे सूत्र योगाभ्यासासाठी महत्वाचे आहेत.
निसर्गात सुद्धा विचार करुन आपण चांगले बी शेतात पेरतो. मेहनत मशागत करतो. तेव्हा चांगले पीक येतेे. येथेपण योगाभ्यास गरजेचा आहे.
योगाभ्यासातून मनांत चांगले विचार येतात. त्या चांगल्या विचारातून मन, चित्त व ह्रदय शुद्धी होते.
पण यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ काढला पाहिजे. नित्य नियमाने नामस्मरण केले पाहिजे.
नामस्मरण ही योगाभ्यासाची पहिली पायरी आहेत. त्या नामस्मरणासाठी एकांताची गरज असते. त्याच बरोबर मौनाची गरज असते.
प्रपंचातील या जंजाळात आपण मौन साधु शकत नाही. त्यासाठी आपणास एकांतात जाण्याची गरज असते.
तेथे मौन धारण करुन या योग यज्ञामध्ये काम, क्रोध, मद, मोह, माया या विकाराची अहुती देत बसले पाहिजे.
अशा प्रकारे निर्विकारी झालेले मन योगाभ्यासाचा चांगला सराव करु शकते व जीवनाला आनंदी बनवू शकते.
या योगाभ्यासातून मनुष्य विकारावर मात करण्याची कला शिकून घेतो. योगाभ्यासाठी दिवसातील कांही वेळ दिले पाहिजेत.
असे योग क्षणाचे दान करीत करीत तुम्ही योगी बनु शकता. त्यासाठी तुमची कोणतीही शाररीक, आर्थिक हानी होणार नाही. या दानासाठी कुणाची परवानगी घेणेची गरज नाही.
सकारात्मक विचार करण्यास सुरवात करा. मन आनंदी राहिल असे विचार मनांत पेरा, त्याचे पीक लगेचच तुमच्या हाती येईल. जीवन आनंदमय होवून जाईल.
योगाभ्यासात कांही तत्वे आहेत.
1. एकमेकांची चौकशी करा.
2. त्यांच्या अडीअडचणी लक्षांत घ्या.
3. योग्य ठिकाणी त्यांना मदत करता आली तर करा. 4.अशी संधी परत येणार नाही. याची जाणीव ठेवून आलेल्या संधीचा फायदा घेवून संधीचे सोने करा.
5.चिंतनामध्ये इतरांनी आपल्यासाठी केलेल्या मदतीचा, साथीचा, विचार करा, त्याचे आभार माना.
तुमचे जीवनच बदलून जाईल. तुम्ही एक आदर्श योगअभ्यासक होेवून जनमानसांत नाव कमवाल.
जेष्ठ नागरिकांना या टप्यावर आपल्या प्रकृतीला सोसेल असा हा योगाभ्यास करावा व जीवन जगण्याची उर्मी वाढवावी.