अहिंसा परमो धर्म

धर्म याचा अर्थ वागण्याची रीत, पद्धत, संस्कृति.

हिंदू संस्कृति, जैन संस्कृति अहिंसा हा मोठा धर्म आहे असे सांगते. विशेषत: जैन धर्मा मध्ये अहिंसेला फार महत्व दिले आहे. जैन तिर्थंकरानी अहिंसा या धर्माचे पालन व प्रचार केला आहे.

परमेश्‍वराचा धर्म, वागण्याची प्रवृत्ती कोणती?, तर काया, वाचा, मने कोणाला दु:ख होईल, कोणाची हिंसा होईल असे न वागणे.

मनुष्य जन्मापासून शेवटच्या श्‍वासापर्यंत अखंड बरी वाईट अशी कर्मे करीत असतो. ती मोजत बसण्याला, त्यांची आठवण ठेवण्यास त्याला वेळ नसतो. मात्र त्याचा हिशोब परमेश्‍वराजवळ असतो.

पाप-पुण्याचा तराजु परमेश्‍वराच्या हातात असतो. मात्र त्याची फळे केव्हा-कशी द्यायची याचा विचार परमेश्‍वराकडे असतो.

काही कर्माची शिक्षा ताबडतोब मिळते. काहींची शिक्षा कालांतराने मिळते, तर काही कर्मे पुढील जन्मात फळे देऊन जातात.

मात्र कोणत्याही कर्माचे फळ मिळत नाही असे होत नाही. ते फळ भोगावेच लागते. त्यामुळे हा कर्माचा सिद्धांत जैन धर्मामध्ये महत्वाचा सांगतिला आहे.

त्यासाठी कर्म करीत असताना दिनचर्या कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

दिवसाची सुरवात पहाटेच्या वेळी करावी. ज्या परमेश्‍वराने आपणांस या सृष्टीचे दर्शन दिले त्याचे आभार त्याला वंदन करुन मानावेत.

हा योगाभ्यास सुरु करावा.

माणसाच्या अन्न-वस्त्र-निवारा या महत्वाच्या तीन गरजा सांगितल्या आहेत.

त्यामध्ये अन्न ही पहिली गरज आहे.

तेव्हा अहिंसेचे पालन करण्यासाठी शाकाहार हाच जीवनाचा पाया आहे असे म्हटले जाते. त्यामुळे मूक प्राण्यांची हत्या थांबते. त्यांना आनंदी जीवन जगता येते. त्यामुळे हिंसा रोखली जाते व अहिंसा या उच्च संस्कृतिचे पालन केले जाते.

योगासनातील प्राणायाम हा फुफ्फुसासाठी सांगितला आहे. तसेच ध्यानधारणा ही मन:शांती साठी सांगितली आहे. तर योगासने शरिरासाठी सांगितली आहेत.

शरीराला लागणारी ऑक्सिजन झाडापासून मिळतो. त्यांचे संवर्धन पर्यावरण हे शाकाहारातून केले जाते. प्राण्यांना अभय दिले जाते. त्यामुळे शाकाहारी जीवन हा उच्च धर्म सांगितला आहे.

प्रपंच करीत असताना त्या त्या वयात विशेषत: स्त्रियामध्ये अलंकाराची ओढ दिसून येते. तिची हौस पुरविण्यासाठी हजारो रुपये कमवून गोरगरीबांवर हिंसेचे शस्त्र उभारुन पुर्तता केली जाते. ही पण एक प्रकारची हिंसाच होय. तेव्हा दागदागिंने, भारीवस्त्रे वापरणे ही हिंसा आहे. ती टाळण्याचा माणसाने प्रयत्न करावे असेे जैन धर्मात प्रतिपादन केले आहे.

आता माणूस जसा जसा श्रीमंत होतो. तसा तो खेड्यातील साध्या घरातून शहरामध्ये बंगल्यात रहावयाला येतो. त्याची ही हौस पण अनेकजणांना पिळून काढून मिळविलेल्या पैशातून पैशातून भागते. ही पण एक प्रकारची हिंसाच आहे व जैन धर्मामध्ये या हिंसेबद्दल अहिंसा हा तुमचा श्रेष्ठ धर्म आहे असे तिर्थंकरांनी बजावून सांगितले आहे.

याप्रमाणे काया, वाचा, मने, कळत न कळत झालेल्या मद, मोह, माया, अहंकार या वृत्तीतून झालेली हिंसा थांबविणे यालाच अहिंसा परमोधर्म असे म्हणले आहे.

Leave a comment