विरह हा शब्द कानी पडताच एक सुंदर काव्य आर्त हाक कानी पडते, ती सावरकरांची-
ने मजसी ने परत मातृभूमिला, सागरा प्राण तळमळला !
या एका काव्य पंक्तितून विरह काय असतो हे समोर येते त्याची उत्कटता समोर येते. विरह म्हणजे, गुमनाम होणे, साथ सोडणे, अपेक्षित ठिकाणी नसणे.
एकदा मी घाई गडबडीत ऑफिसला निघालो, ऑफिस मध्ये गेल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या खिशात पाकीट नाही. पेन नाही, मनांत निरनिराळे विचार सुरु होतात.
त्या पाकीटला जोडून असणार्या प्रत्येक गोष्टीची आठवण मला येत गेली. त्या पाकीटाच्या विरहामुळे त्यांत असलेले आधार कार्ड, पॅनकार्ड, पेन इ. गोष्टींची आठवण झाली. त्याचे विरहातून काय काय गोष्टी घडतील याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले . मी त्या पाकीटाच्या विरहामुळे हवालदील झालो.
तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. माझ्या पत्नीचा फोन होता. ती म्हणाली आज तुम्ही तुमचे पेन सर्व विसरुन गेला.
त्या एका वाक्यामुळे माझ्या विचाराचे चक्र बदलले. मला हायसे वाटले पण तो कांही क्षणाचा काळ मात्र खूप कांही शिकवून गेला. विरह काय असतो सांगुन गेला.
जीवनात पण अनेक ठिकाणी आपणाला अनेक गोष्टींचा संयोग होतो तेथे त्याची किंमत कळत नाही. पण ज्यावेळी हा संयोग दुरावतो. विरह होतो त्यावेळी त्याचे महत्व कळते.
ज्या थोर नेत्यांनी आपल्या कौशल्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचा विरह होवू नये म्हणून त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी आपण करीत असतो. ही आपली संस्कृती आहे.
प्रपंचात पण अशीच नाती जोडावी जातात. त्या नात्यामध्ये एकमेकांना एकमेकांसाठी बरेच कांही केले असते. पण दुर्दैवाने त्याचेमध्ये वितुष्ट येते व त्यांचे नात्यामध्ये विरह उत्पन्न होतो. ही घटना भयानक असते.
यासाठी जोडीदारावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. काही वेळा अहंकार पण विरहाचे कारण होवून बसतो. तेव्हा अहंकार रहित निर्मोही होण्याचा प्रयत्न करा.
नम्रता, शालिनता या गोष्टी विरह कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. परमार्थामध्ये पण या विरहाचे फार महत्व सांगितले आहे.
परमेश्वराने माणसासाठी भले मोठे दुकान उघडले आहे. त्याच्या दुकानात सर्व गोष्टी तो विनामोल माणसाला देत असतो, याची माणसाला कदर नसते.
पण ज्यावेळी त्यातील एखादी वस्तु गहाळ होते. काम करेनाशी होते. तेव्हा आपणाला त्या वस्तुचे परमेश्वराच्या कृपेचे मोल कळते.
येथे पण वस्तुचा विरह त्यांची किंमत दाखवून देतो. यासाठी साधकाने परमेश्वराचा विरह होवू नये म्हणून नित्य नियमाने नामस्मरण करीत रहावे.
त्या नामाचा विरह होवू देवू नये. विरहाने कलह उत्पन्न होतो. कलह प्रपंचाचा नाश करतो. म्हणून प्रापंचिकाने विरहाचे महत्व लक्षांत घेवून भक्तीने, प्रेमाने नामस्करण करीत जावे.