वेळ

वेळ, वक्त आनेपर सब कुछ ठीक होता है ॥
जीवनात वेळेला अतिशय महत्व आहे. कारण वेळ ही सर्वांवर येते. ती कधी येते ते सांगता येत नाही. वेळ चुकली की पश्‍चाताप करावा लागतो व वेळ साधली की कौतुक होते. भिंतीवर अडकवलेले घड्याळ मनगटावर बांधलेले घड्याळ माणसाला वेळेवर काम करण्यास प्रवृत्त करते. असे वेळेचे तंत्र फार अवघड आहे. प्रसुतीगृहात बाहेर वाटबघणारे बाळाच्या रडण्याच्या आवाजाकडे कान देऊन हातातील घड्याळावर वेळ बघत असतात. त्या वेळेवर बाळाची जन्मकुंडली मांडली जाते. ग्रह, नक्षत्र या सर्व गोष्टी वेळेकडे पाहुन वर्तवल्या जातात. कोणत्याही शुभकार्याची सुरवात वेळ पाहून केली जाते. कारण त्याच्या कार्याला अनुकूल ग्रह कसे आहेत हे वेळ सांगते. वेळ होऊन गेल्यावर प्रसुती झाली नाही तर धोका लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करुन बाईला मोकळे करावे लागते.
वेळेत शिक्षण दिले, संस्कार दिले तर ते आयुष्यभर टिकतात, त्यांचे आयुष्य चांगले जाते. एखादी अघटित घटना घडून गेली व प्राण वाचले तर आपण म्हणतो काळ आला पण वेळ आली नव्हती, म्हणून वाचला. प्रत्येकाने विश्‍वासाने एकच गोष्ट ध्यानात घ्यायची असते ती म्हणजे जे ज्या वेळी घडते ते योग्य समजून घ्यायचे. कारण त्या घटनेचे घड्याळ परमेश्‍वराचे हातात बांधलेले असते.
अत्यंत कष्ट करुन एखादा मुलगा शिक्षण घेतो, मोठा डॉक्टर होतो, सर्जन होतो व नांव कमवतो, तो खडतर प्रसंगातून गेलेला असतो. ज्या वेळी त्याचे कौतुक होते, त्यावेळी परस्थितीशी झगडत घालविलेल्या वेळेची किंमत त्याला कळते. तेव्हा वेळ ही प्रत्येकाचे आयुष्यात येणारी संधी आहे. विवेकाने, चिंतनाने, विचार करुन वेळेचा फायदा कसा घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

Leave a comment