कोणाची पाऊले लोक वंदतात?
तर बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले!
जो बोलतो तसे वागतो, आपल्या वचनाला एकनिष्ठ असतो, तो ज्या मार्गाने जातो त्यामार्गावर लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी रांगा लाऊन उभे असतात. येथे उत्तम पुरुषाचे लक्षण सांगितले आहे.
यानिमित्ताने या दुनियेत काय दिसते यावर एक काव्य नजरे समोर आले ते असे –
या दुनियेची रीत निराळी, दिसते तसे नसते हास्य, जरी ते वदनी फुलले,
मनी परंतु असुया असते, पर दुखाने पिघळून जाणे,
हे तर आता कुठे न दिसते, मृगजळा सम सत्य भासते,
परंतु सारी फसगत असते, कितीही मिळाले तरीही पाहिजे, हव्यासाला सिमा न उरते, त्यागातच खरोखर जग जगते,
हीच अस्मिता होती आपुली, युगा युगाची प्रतिभा होती,
भोग संस्कृती अलगत शिरली, त्याग संस्कृती विसरुनी गेली,
म्हणूनी म्हणावे वाटते.. बोले तैसा चाले त्याचि वंदावी पाऊले…
जो त्याग करुन दिलेल्या शब्दाचे पालन करतो, कर्णासारखे वचन पाळतो, त्याची पाऊले लोक वंदतात. असा ऐक सुंदर संदेश जगाला दिला जातो.
आपण पहातो. राजकारणात मोठे राजकारणी निवडून समोर येताच मतदार संघाला भेट देतात. मला निवडून द्या. मी तुमची ही कामे, ती कामे, या या सोई करुन देईन. तुमचे कल्याण करीन, गरीबी हटवेन अशी अश्वासने देतात.
निवडणूक संपते तो निवडून येतो व पुढील निवडणुकीपर्यंत मतदार संघात येतच नाही. अशा वेळी त्याच्या पावलांचे दर्शन कोणी घेईल का?
जो जसे बोलतो तसे वागतो. आपले कर्तव्य पूर्ण करतो. ते करीत असताना प्रसंगी मोठा त्याग करण्याची वेळ आली तरी मागे पुढे पहात नाही. ही माणसे वंदनीय होतात. त्यांचे पुतळे उभे कले जातात. त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवला जातो.
प्रजासत्ताक दिनी काय किंवा स्वतंत्र्य दिना दिवशी काय आपण पहातो, शाळेत सर्व विद्यार्थी एका तालात लेप्ट-राईट करीत संचलन करीत असतात. त्यांचा म्होरक्या ज्याप्रमाणे तालावर डावा, उजवा म्हणतो त्या तालावर इतर मुलांची पाऊले पडतात. ही सुंदर रपेट पाहुन त्या कार्यक्रमासाठी आलेली थोर व्यक्तीपण त्या बालकाला नमस्कार करते. हे उदाहरण काय सुचविते?
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’
परमार्थातपण याची प्रचिती येते.
ज्या संतांनी मद, मोह, माया, मत्सर, असुया, राग, लोभ, द्वेष या शत्रुवर विजय मिळविला व आपला मार्ग पुढे आक्रमला त्यांची पाऊले सर्व जनांनी वंदीली, त्यांना नमस्कार केला.
ज्यांनी आपला हट्ट सोडला, जो उपदेश लोकांना केला व त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवली या गोष्टी ज्या साधकांनी बरोबर घेवून त्या संताला वंदन केले तेथे कर माझे जुळती.
बोले तैसा चाले हा आवाज अंत:करणातून आला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचे अंत:करण शुद्ध असले पाहिजे, त्याची वर्तणूक शुद्ध असली पाहिजे. त्याचा दृढ निश्चय असला पाहिजे, त्याने कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द अगर घेतलेले व्रत सोडता कामा नये तरच लोक त्याला वंदन करतील. त्याला देवपण प्राप्त होईल.
प्रपंचात पण नाटकाप्रमाणे बहुरुप्याचे काम करावे लागते. जो साधक अचुकपणे हे काम करतो, त्याला लोक डोक्यावर घेतात. त्याचा उदोउदो करतात. तो यशाचे शिखर गाठतो, त्याची वंदावी पाऊले
1 Comment
सौ. शीला केतकर
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले🙏 आजच्या काळात हे दुर्मिळ आहे.
संस्कृत मध्ये एक श्लोक आहे.
यथा चित्तम् तथा वाच:
यथा वाच:तथा क्रिया
चित्ते वाची क्रियायांच
साधुनां एकरुपता!
जे मनात ते बोलण्यात,जे बोलण्यात ते आपल्या क्रियेत,
ही एकरूपता सज्जनांच्या वागण्यात असते.
🙏 राम कृष्ण हरी 🙏