वंदना

वंदना, हा एक भक्तीचा प्रकार आहे.

वंदन हे भक्तीचे साधन आहे.

वंदना ही भक्तीने केलेली क्रिया आहे.

आयुष्यामध्ये थोरा मोठ्यांना, सद्गुरुंना, आई-वडिलांना वंदन करावे असे संस्कार लहान पणा पासून केले असतात.

त्यामुळे बाहेर पडताना, शाळेत जाताना, परिक्षेला जाताना आपण थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे चरण वंदन करतो . त्यांचे चरण वंदन केल्यामुळे त्यांच्या शरीरात असणारी यशस्वी उर्जा आपोआप वंदन करणार्‍याकडे जाते व तो चांगल्या गुणांनी यशस्वी होतो. यशस्वी झाल्यानंतर त्याचा सत्कार होतो.

तेथे तो म्हणतो हे यश माझे नसून मला प्रेरणा देणार्‍या, आशीर्वाद देणार्‍या गुरुजनांचे, आई-वडीलांचे आहे तेथे “मी” चे संपूर्ण निर्मुलन होते, अहंकार नष्ट होतो माणूस नम्र होतो.

त्याची वंदना भक्ती सफल होते, तो यशाच्या पुढच्या पायर्‍या चढू लागतो .

ही गोष्ट मला एका लग्नात ध्यानात आली.

लग्न होवून वर-वधू आशीर्वाद घेत घेत चालले होते. थोरा मोठ्यांना खाली वाकून वंदन करीत होते. ही त्यांची भक्ती पाहून मी मनांत विचार केला केवढी ही वंदना?

मला त्यावेळी लक्षात आले की वधूचे नांव वंदना आहे. तेव्हा मी तिला आशीर्वाद देताना म्हणालो, सफल  होवो तुझी वंदना.

वंदना हे एका स्त्रीचे नांव आहे. त्यामध्ये नम्रता आहे. हा एक भक्तीचा प्रकार आहे.

परमार्थात पण परमेश्‍वर प्राप्ती हवी असेल तर डोंगर माथ्यावर असणार्‍या परमेश्‍वराची वंदना भक्ती करणे साधकाचे कर्तव्य समजले जाते व त्याने केलेली ही वंदन भक्ती सफल  होते.

नुसते तोंडाने वल्गना करुन वंदना होत नाही, तर तन, मन, धन अर्पून माणसाने परमेश्‍वराची वंदना करावी.

मंदीरात गेल्यानंतर परमेश्‍वराचे दर्शन घेऊन आपण परमेश्‍वराचे भोवती तीन प्रदक्षिणा घालतो. ही पण वंदना भक्ती होय.

तेथे साधक नम्रतेने परमेश्‍वराची भक्ती करतो.  जो एखादी गोष्ट साध्य करुन घेण्यासाठी साध्य वस्तुभोवती घातलेल्या फेर्‍याचा प्रकार असतो.

प्रपंचात बालकाला वडीलांकडून कांही हवे असेल, तर तो वडीलाभोवती फेर्‍या घालतो, गोंडा घोळतो. हा एक अट्टहास आहे. ही पण वंदना भक्तीच होय.

लहानांनी मोठ्याभोवती हवी ती वस्तु मिळण्यासाठी केलेली याचना याला वंदना भक्ती म्हणतात.

प्रथम या भक्तीसाठी साधकामध्ये नम्रता हा गुण येणे गरजेचे आहे. त्याने आपले साध्य काय आहे याचे चिंतन करुन मंदीरात गेल्यानंतर परमेश्‍वरासमोर मांडले पाहिजे व नंतर परमेेेेेेेेश्‍वरा भोवती फेर्‍या घातल्या पाहिजेत.

ही वंदना भक्तीची कल्पना आहे.

कांहीजण आपली इच्छा ह्रदयात स्थिर करुन माझा परमेश्‍वर माझ्यातच आहे, असे मानुन  स्वत: भोवतीच फेर्‍या मारतात. ही पण वंदना भक्तीच आहे.

दर्शन घेताना परमेश्‍वराचे जे अनेक गुण आहेत, त्याचे आपणास दर्शन होते व त्या चांगल्या गुणांपैकी काही गुण आपणाकडे यावेत ही भावना ठेवून जेव्हा साधक परमेश्‍वराभोवती फेर्‍या घालतो तेव्हा ती वंदना भक्ती होते.

त्या भक्तीने परमेश्‍वर प्रसन्न होवून साधकाचे मदतीस धावतो.

निसर्गामध्ये सुद्धा पृथ्वी सूर्याभोवती वंदना भक्ती करीत असते.

थोरामोठ्यांचा आशीर्वाद लाभावा, त्यांच्यातील चैतन्याचा थोडा प्रभाव आपणावर पडावा हा या भक्तीचा उद्देश असतो.

याच भावनेने दरवर्षी वारकरी पंढरपूरची वारी करीत असतात. ती वारी निरंतर चालू रहावी अशी प्रार्थना करीत असतात. ती वारी निरंतर चालू रहावी अशी प्रार्थना करीत असतात.

आपणही आपल्या आयुष्यात शांती मिळावी म्हणून परमेश्‍वराची वंदना करावी.

Leave a comment