वैराग्य ज्ञान

प्रापंचिक प्रपंच करीत असताना रोज त्याचे समोर अनेक अव्हाने उभी रहातात.

एक गोष्ट संपली की, दुसरी समोर येते. ती पूर्ण करण्याचे आव्हान समोर येते.

तेथे या मायाजाळातून सुटका करुन घेणे अवघड होवून बसते. कळत न कळत तो परत प्रपंचात अडकला जातो.

जो उत्तम पुरुष असतो, तो विवेक जागृत करुन प्रपंचातील अव्हानांना तोंड देत देत पुढील संकटांना थोपवितो व नकळत या दगदगीतून माघार घेतो.

त्याला कोठे थांबायचे याचे ज्ञान होते. हे वैराग्यज्ञान होय.

ही वैराग्यवृत्ती एकदम प्राप्त होत नाही. त्या वृत्तीचे ज्ञान प्रपंच करता करता होते.

यासाठी प्रापंचीकाने प्रपंच करीत असताना हा प्रपंच कुणाचा आहे? तो आपण कुणासाठी करीत आहोत? यांत आपले साथीदार कोण आहेत? याचा विचार करावा.

लाभासाठी, स्वार्थापोटी चिकटलेल्या व्यक्तींना नातलगांना दूर करावे. त्यांना त्याची जाणीव पण होवू देवू नये. तरच तो माणूस विवेकी बनून वैराग्याकडे जावू शकतो.

यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कर्मेंद्रियांवर स्वामित्व मिळवावे लागते. राग, लोभ, आलस्य यावर नियंत्रण ठेवावे लागते. कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करणे ही वृत्ती जोपासावी लागते.

सर्वात असून कशात नसल्यासारखे कमळाच्या फुलासारखे रहाणे जमवावे लागते. तसा प्रयत्न विवेकी साधक करीत असतो. यासाठी सतत चिंतन अभ्यास गरजेचे आहे.

यासाठी प्रपंच ही भूमि परमेश्‍वराने साधकाला तालीम म्हणून दिली आहे. तेथे साधकाने परमार्थाच्या कुस्तीत भाग घ्यावयाचा असतो व आपल्या चातुर्याने वैराग्य ज्ञानाने ही कुस्ती जिंकायची असते.

वैराग्य ज्ञान हा ज्ञानाचा मोठा साठा आहे. तो विवेकाने उघडावयाचा असतो.

त्यात असणारे गुढ कुणासमोर उघड करावयाचे नसते. त्यासाठी संरक्षक म्हणून मौनाची नेमणूक करावयाची असते. त्याने चौफेर नजर ठेवून योग्य मार्ग साधकाला दाखवायचा असतो. वैराग्य हे सांगीवांगी ज्ञान नसावे.

कोणीतरी सांगितले व आपण आमलात आणणे असे नसावे. त्यामध्ये चांगले श्रवण असावे. त्याचा चांगला अर्थ घ्यावा व ऐकलेल्या वाईट गोष्टींचा त्याग असावा.

हे जो विवेकी साधक करतो, त्याचे वैराग्यज्ञान उजळून येते.

कर्मेंद्रिये सतत कर्म करीत रहातातच. झोपेत देखील त्यांची कर्मे चालू असतात. तेव्हा विवेकी साधक या कर्मेंद्रियांचे आहारी न जाता त्यांना आपल्या अधिपत्याखाली घेवून त्याचेकडून चांगली कामे करुन घेतो पण तेथे पण तो आपले स्वामित्व दाखवित नाही. येथे पण त्याचे वैराग्यज्ञान उजळून येते.

याप्रमाणे प्रपंचात सर्वांचे भले चिंतीत, भले करीत, कुणाला न दुखावता जो कर्म करतो, त्याचे जवळ वैराग्याचा खजिना आहे असे समजावे व त्या खजिन्याचा त्याला अधिकारी बनवावे, त्याला चिरंजीव पद अर्पण करावे.
हाच आहे वैराग्यज्ञानाचा खजिना. मुक्त हस्ते सर्वांनी लुटावा.

Leave a comment