ज्ञान, दर्शन, चारित्र्य या गोष्टी माणसाने मनुष्य जन्मात येऊन करावयाच्या असतात.
जीवन कसे जगायचे याचे ज्ञान ज्या ग्रंथात सांगितले आहे, तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी त्या ग्रंथाचे पठण, वाचन रोज करावे.
रोज एकतरी अभंग वाचावा व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा.
ज्ञानेश्वरी वाचनातून ज्ञानप्राप्ती झाल्यावर आपले ध्येय निश्चित करावे; ते म्हणजे पंढरी पहाण्याचे तेथे असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेणे.
या प्रमाणे वाचनाने ज्ञाने झाले, चिंतनाने ध्येय नक्की केले आता पंढरी पहाण्यासाठी प्रयत्न सुरु करावेत.
हे प्रयत्न म्हणजे न चुकता दरवर्षी पायवारी करुन पंढरीला जाणे, पांडुरंगाचे दर्शन घेणे.
म्हणून जनाबाई आपल्या अभंगात सांगत आहेत. रोज वाचावी ज्ञानेश्वरी व पायवारी करीत पहावी पंढरी.
पंढरी याचा अर्थ वारकरी मेळावा जो आषाढी – कार्तिकी समजला जातो. वर्षातून दोन वेळा येतो.
ज्ञानेश्वरी मध्ये गीतेचे सार आहे. सर्व बारीक सारीक गोष्टींचे विवेचन त्यामध्ये आहे.
माणसाने माणूस म्हणून कसे जगावे, आपली दिनचर्या कशी ठेवावी, आपले विचार कसे असावेत, त्या विचारात विश्वव्यापकता कशी असावी, मनामध्ये इतरांबद्दल भाव कसा असावा, आसक्ती रहीत जीवन कसे जगावे, सत्याची बाजू कशी मजबूत असते, श्रद्धेने काय मिळते, शत्रुला देखील मित्र कसे बनविता येते,अशा अनेक गोष्टींचे निरुपण ज्ञानेश्वरी मध्ये पहावयास मिळते.
म्हणून रोज नियमाने एकतरी ओवी ज्ञानेश्वरीची पाठ करावी व त्याप्रमाणे आचरण करावे.
अशा नित्य परीपाठातून आपण जगदीश्वर वर पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकतो, पंढरी पाहू शकतो.
त्याप्रमाणे प्रत्येकाने ज्ञानेश्वरी पठण करा, त्याप्रमाणे पंढरीची वारी आचरणात आणा व पंढरीत उभ्या असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घ्या.
यातच तुमचे जीवनाचे सार्थक होईल. म्हणून जनाबाई म्हणतात…
वाचावी ज्ञानेश्वरी… पहावी पंढरी..