वारी याचा अर्थ प्रथा.
जीवनात अनेक प्रथा चालू असतात. त्या त्या कार्याला वारीचे नाव दिले जाते. जसे एक गोष्ट न चुकता परत परत प्रेमाने करीत रहाणे याला वारी म्हणतात.
विद्यार्थी जीवनात परीक्षेची वारी दरवर्षी येते. त्यातून त्याची शैक्षणीक प्रगती होवून तो विद्यार्थी ज्ञानी होतो. त्याच्या शैक्षणिक ज्ञानामुळे समाज अज्ञानातून सज्ञानाकडे जातो.
प्रवास करीत असताना तिकीट घेण्यासाठी माणसे रांगेत उभी असतात. एक एक करुन ती माणसे पुढे पुढे सरकत असतात व तिकीट खिडकी पर्यंत पोहचतात.
माणसाला प्रगती पथावर नेण्याचे काम या वारीमुळे होते. अनेक वर्षे ही वारी संत मेळावा घेऊन पुढे पुढे चालली आहे. समाज उद्धारासाठी जनजागृतीसाठी ही पुढे पुढे चालणारी वारी हे एक सांस्कृतिक विद्यापीठ आहे.
गावा-गावातून पांडुरंगाचे नाम घेत वारकरी प्रयाण करीत असतात. हातात टाळ मृदूंग असतो. प्रपंचातील पेरणी वगैरे कामे झालेली असतात.
अशा वेळी प्रपंचातील समाधान घेऊन ज्या विठ्ठलाने हे समाधान दिले आहे, त्याला भेटावयाला निघालेल्या साधकांचा पाय मेळावा म्हणजे वारी होय.
प्रात:काळी लवकर उठून प्रसन्न भावाने हरिपाठ व काकड आरती करुन एका गावापासून दुसर्या गावापर्यंत ही वारी प्रवास करते. टाळमृदंगाच्या नादात दुसरे ठिकाण कधी आले त्याची कल्पना पण येत नाही.
असा या पायवारीचा महिमा आहे.
पांडुरंगाचे नांव मुखे घेत घेत वारी पुढे चालू ठेवा. प्रपंचाची कोणतीही चिंता न धरता वारी पुढे पुढे चालू ठेवा.
साधकाच्या मनामध्ये पांडुरंगाबद्दल काय भाव असतो तो पुढील वचनातून आपल्या ध्यानी येईल.
पांडुरंग माझा कैवल्याचा पुतळा आहे. तो भूमीवर आल्यामुळे सर्वत्र चैतन्य प्रगट झाले आहे. माझा ज्ञानदेव विष्णुचा अवतार घेवून आला आहे. तो माझा सखा आहे. वारी मध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रियांचा, माता-भगिनींचा मोठा सहभाग असतो.
सकाळी सर्व वारकरी पांडुरंगाला चिंतीत चिंतीत पुढे पुढे चालत असतात. बोलता चालता पहाता सर्वच विठ्ठल नामाची गर्जना करीत वारी पुढे चालत असते.
चोखा मेळा म्हणतात, ‘विठ्ठल विठ्ठल गर्जती अवघी दुमदुमली पंढरी.’
थोडक्यात विठ्ठलाचे नांवे सोपे व सहज घेतल्यासारखे आहे. त्यामुळे हा भवसागर तरुन जाण्याचे बळ प्राप्त होईल.
विठ्ठल विठ्ठल हा तारकमंत्र आहे. याची जाण संपूर्ण वारी पुढे पुढे चालत असताना साधक समाजाला देत असतो.
अशाप्रकारे प्रपंचातून परमार्थात प्रवेश करण्यासाठी सातत्याने साधकाने वारी पुढे पुढे चालत ठेवली पाहिजे.
1 Comment
Anonymous
वारी
विषय खूपच छान आहे. वारी आपल्याला जीवनात खरंच पुढे नेत असते. वारीला सातत्य असते. पंढरीची वारी, प्रवासाची वारी, परीक्षेची वारी, म्हणून साधकांनी प्रपंचातून परमार्थात जाताना वारी सतत चालू ठेवली पाहिजे. विचार आवडला