ज्यावेळी आपल्या समोर एखादी कलाकृती येते, एखादे आश्चर्य येते तेव्हा त्याचे सौंदर्य पाहून सहज आपल्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडते ‘‘कोण आहे याचा शिल्पकार’’.
हल्ली साधे घर बांधावयाचे असेल तरी त्याचा सर्व आराखडा कागदावर उतरवला असतो. त्या घराचे, घरातील माणसांचे घरबांधणार्या माणसाच्या कुवतीचे आर्थिक नियोजनाच्या पद्धतीचे सर्व चिंतन करुन मग तो आराखडा समोर ठेवला जातो.
त्यातील बदल गरजेप्रमाणे विचरांती करुन मग कामाला सुरुवात केली जाते. तेथे शिल्पकार हा महत्वाचा असतो.
त्याचे चिंतन, मनन व सूचना महत्वाच्या असतात. आपण त्या सूचनांचा तगादा लावत आपलाच हट्ट पुढे करु लागलो तर ते शिल्प उभे राहू शकत नाही.
तसे आपले जीवन हे पण एक शिल्प आहे. प्रत्येकाचे शिल्प हे एक दुसर्या सारखे समान असेलच असे नाही. तर गरजेप्रमाणे परिस्थितीप्रमाणे ते बदलत जाते, बदलणे गरजेचे बनते.
तेव्हा प्रपंच करीत असताना आपणास या प्रपंचात नक्की काय करावयाचे आहे? त्या केल्यामुळे कुणाला किती फायदा होणार आहे? त्या गोष्टी दुसर्यांना त्रासाच्या होणार नाहीत ना? याचा सारासार विचार करुन कोठेही अतिक्रमण न करता तो प्रपंचाचा आराखडा समोर येतो तेव्हा समाजात, गावात त्या घराला चांगला आकार येतो व सर्व लोक त्या घराची स्तुती करतात.
ते एक आदर्श घर म्हणून बघितलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या मुलभूत गरजा आहेत. तेव्हा त्या कशाही प्रकारे माणूस पूर्ण करीत असतो.
पण या पूर्ण करताना इतरांचे हक्कावर मुलभूत आधिकारावर आपण घाला घालीत नाही ना ? याचा विचार शिल्पकार म्हणजे आपण स्वत: करावयाचा असतो.
तरच कुठे भांडणे, कोर्ट कचेर्या कराव्या लागत नाही व जीवन आनंदमय होवून समाज त्याचे घराकडे आदर्श म्हणून पाहु लागतो.
आपले जीवन कसे असावे? आपली आर्थिक क्षमता कशी आहे ? आपण कुणावर अत्याचार अगर अतिक्रमण करीत नाही ना? या सर्व गोष्टी स्वत:च पहावयाच्या असतात.
इतरांनी सांगितल्या व आपण ऐकल्या व त्याचा विवेकाने विचार न करता अट्टाहास करीत गेलो तर प्रपंचाची राख रांगोळी झाल्या शिवाय रहाणार नाही.
म्हणून म्हटले आहे, ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’.