जीवनात काय, प्रपंचात काय, निसर्गात काय, राजकारणात काय, सर्वत्र सीमा रेषा ओढलेल्या असतात.
आजपर्यंत आपण अनेक अनेक उदाहरणे पाहिली जेथे सीमा रेषा ओलांडली व त्याचे दुष्परिणाम नजरेस आले. रामायणामध्ये सीतेकडून सीमा रेषांचे उल्लंघन झाले व एवढे रामायण घडले.
प्रपंचात पण क्षणोक्षणी आपणा समोर वेगळया गोष्टी असाव्यात अशी भावना होत असते. एक गोष्ट मिळाली तेथे तो थांबत नाही. अजून अधिक प्रमाणात ती मिळावी अशी इच्छा ठेवतो. त्या धुंदीमध्ये त्याला सीमारेषा दिसत नाही. तो सतत सिमारेषेचे उलंघन करीत रहातो. त्यामुळे त्याचे जीवनातील शांतता, समाधान, सुख लयाला जाते.
तेव्हा सीमारेषांचे वाचन करण्याची कला माणसाने शिकली पाहिजे. खेळात पण सीमा रेषा आखलेल्या असतात. त्यांचे उलंघन होताच तो गडी बाद होतो. याउलट निसर्गात समुद्राकडे पहा. अनेक नद्या भरभरुन त्याला मिळत असतात तो सर्व नाद्यांचे पाणी साठवून घेतो. पण कधी उन्मत न होता आपल्या सीमारेषेत रहातो. तेथे त्याची भव्यता दिसून येते.
आपण प्रापंचिक आहोत. प्रपंच करीत असताना स्वार्थ जपावा लागतो. त्याशिवाय प्रपंच होवूच शकत नाही. पण त्या स्वार्थाची पण एक सीमारेषा आखलेली असते. त्या सीमा रेषेच आकलन माणसाला चिंतनातून मननातून होते. ते करण्यासाठी त्याचे जवळ विवेक असावा लागतो.
विवेकाने एकदा सीमा रेषेचे अवलोकन केले की त्या रेषेत राहून प्रपंच कसा करावयाचा याची कला त्याला अवगत होते.
तेथे त्याची इतराकडे बघण्याची दृष्टी बदलते. आपली गरज लक्षात येते व कुठे थांबायचे याचे ज्ञान होते.
स्वार्थाचे सिमोलंघन होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. स्वार्थाचे सिमोलंघन टळते.
परमेश्वर प्रसन्न होवून आपणाला जे हवे आहे ते देतो, देतच रहातो.
पण पोट भरल्यावर सिमारेषा दिसल्यावर नको म्हणण्याची भावना आपल्यामध्ये यायला हवी यासाठी स्वार्थाचे सिमोलंघन होवू नये असा प्रयत्न करावा.