स्पर्श

माणसामध्ये जी पांच ज्ञानेंद्रिय सांगितली आहेत. ती म्हणजे नेत्र, कर्ण, जिव्हा, त्वचा, मस्तक.

त्यातील त्वचा ही सर्व शरिरभर पसरलेली असते. त्या त्वचेचे संरक्षण स्पर्शाने केले जाते. तो स्पर्श संपूर्ण शरीराचा अंगरक्षक म्हणून काम करीत असतो. थोडक्यात शरीराचा कमांडो रक्षक असेही स्पर्शाला म्हटले जाते.

पहाना, शरीरावर बसलेली माशी एका सेकंदात आपण बाजूला काढतो, झटकतो ते या कमांडो मुळे. त्यामुळे असा हा स्पर्श विजेच्या वाहीनीचे काम करतो.

एखाद्या ठिकाणी ठेच लागली तर लगेच त्याचे प्रतिसाद शॉक बसल्यासारखे तोंडातून बाहेर पडतात.

स्पर्श ज्ञान हे मोठे ज्ञान आहे. ते जोपर्यंत चांगले असते तोपर्यंत माणसाच्या मनामध्ये चांगल्या भावना, प्रेमळभाव, आपुलकी ही वास करुन असते. जेव्हा हे स्पर्शज्ञान नष्ट होते, त्यावेळी तो माणूस विकलांग होवून जातो. त्याला कशाची जाणीव रहात नाही. त्याच्या मनाला पण कांही संवेदना जाणवत नाहीत. प्रपंचातील होणारी सुखदु:खं त्याला जाणवत नाहीत. तो नैराश्यामध्ये बुडून जातो.

मनुष्य जीवनात या स्पर्शाला फार महत्व आहे. बालक जन्म घेते त्यावेळी जन्मानंतर त्या बालकाची आईशी जोडलेली नाळ कापली जाते. त्या कापल्या जाणार्‍या स्पर्शामुळे बालक रडत जन्म घेते. तर मायेचा हात, आईचा हात अंगावर पडताच ते रडणारे बाळ शांत होते. येथे प्रथम स्पर्शाची प्रचिती येते.

बाल्यावस्थेत मुले फार खोडकर असतात, कांहीतरी खोड्या करुन रोज तक्रारी घरी आणत असता. अशावेळी आई-वडील त्याला माराचा स्पर्श देवून सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्याचा खोडकरपणा त्या स्पर्शामुळे कमी होतो.

शिक्षणासाठी ज्यावेळी मुलाला गुरुगृही किंवा शाळेत पाठविले जाते तेव्हा त्याला सुधारणेसाठी त्याचेवर चांगले संस्कार होण्यासाठी गुरुजी चांगल्या कामाबद्दल कौतुकाची थाप पाठीवर टाकतात. तर एखाद्या चुकीसाठी हातावर छडीचा मार देतात.

हा पण स्पर्श आहे, संस्कार आहे. तेथे त्याचे महत्व फार मोठे आहे.

असा हा स्पर्श ज्यावेळी दोन राजकरण्यात होतो, हातमिळवणी होते त्यावेळी त्या स्पर्शातून जीवन निती ठरविली जाते व राजकारण घडते.

प्रपंच करीत असताना प्रापंचिकाचा अनेक ठिकाणी स्पर्श होतो, त्यातुन ज्ञानोपासना होते, चांगले वाईट याची पारख होते व सुंदर असे जीवनाचे वस्त्र तयार होते. हा पण स्पर्श माणसाने लक्षात घेतला पाहिजे.

स्पर्शामध्ये आसक्ती असते. एकदा का माणसाने पैशाला स्पर्श केला की त्याला पैशाची आसक्ती लागते. ती आसक्ती, हाव कधी कमी होत नाही. यासाठी परमार्थात स्पर्शाचे फार महत्व सांगीतले आहे.

ज्यावेळी साधकाला साधुसंतांचा आशीर्वाद लाभतो, स्पर्श होतो. त्यावेळी त्या साधकांची हाव कमी होऊ लागते, विषयासक्ती कमी कमी होवू लागते व तो हळूहळू प्रपंचातून परमार्थात जाऊ लागतो. साधूसंत हे कधी ही धनाच्या स्पर्शाला हपापलेले नसतात. त्यांनी धनाचा स्पर्श वर्ज केलेले असतो. त्यामुळे भगवंत त्यांचेवर आशीर्वादाची कृपा करीत असतो.

परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते. म्हणजे अज्ञानाचा अंध:कार जाणून ज्ञानाची उत्पत्ती होते. त्याप्रमाणे जीवनात साधुसंतांच्या चरणाचा स्पर्श ज्यावेळी आपल्या घराला होईल तेव्हा घर, जीवन स्वर्ग बनेल.

स्पर्श हा अतिशय संवेदनाशील आहे. विवेकाने, चिंतनाने त्याचा वापर करुन गरजुंचा आधार, दुःखीजनांचा तारणहार तो स्पर्श व्हावा अशी सर्व संत प्रार्थना करीत असतात. तसे पसायदान पण मागत असतात. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असा हा स्पर्श महिमा सांगतो.

Leave a comment