श्री गणेशाला 21 दूर्वा कां वाहव्यात?

दूर्वा म्हणजे दूर वाहणारा.

संसारातील दुःख दूर वहाणारा, दूर करणारा असा श्री म्हणजे श्री गणेश होय. अशा या दुःख दूर करणार्‍या गणेशाला 21 (एकवीस) दूर्वा कां वहायच्या याचा आपण विचार करु.
प्रपंच करीत असताना, काम, क्रोध, मोह, लाभ, मद, मत्सर या षड्रिपुंनी आपणास वेढले असते.

प्रपंच म्हणजे पांच ज्ञानेंद्रीये, पांच कर्मेंद्रिये, पंच महाभूते, पंच प्राण या सर्वांचा बाजार.

या बाजारात सर्वांचे मागे दडून बसलेले जे असते ते अंत:करण.

मन बुद्धी,चित्त,अहंकार हे त्या अंत:करणामध्ये लपून बसलेले असतात.

या चौघांचे मध्ये तीन गुण असतात. ते म्हणजे सत्व, रज, तम्.

या तीन गुणांचे मागे असते द्वैत, म्हणजे मूळ माया, म्हणजे परब्रम्ह आणि त्याच्या मागे असते ते अद्वैत म्हणजेच श्री गणेश.

आता या सर्वांची बेरीज करुया. षडरिपुचे सहा, प्रपंचाचे पांच, चतुष्टयंचे चार, गुणांचे तीन, द्वैताचे दोन या सर्वांची बेरीज होते वीस आणि शेवटी रहातो तो एक म्हणजे श्री गणेश.

यातील एकवीस पैकी वीस दूर्वा दु:खाच्या वीस कारणांना दूर करण्यासाठी व एकवीसावी दूर्वा अशा या अद्वैत असणार्‍या गणेशाला अर्पण करावी.

त्यामुळे गणेश कृपा होवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यातून मुक्ती होईल व स्वानंद प्राप्त होईल.

म्हणून गणेश पूजन एकवीस दूर्वा वाहून करावे.

Leave a comment