श्रद्धा

श्रद्धा हा एक भाव आहे.

प्रपंचातून परमार्थात जाताना ज्याची गरज असते तो भाव म्हणजे श्रद्धा – विश्‍वास होय.

प्रपंचात व परमार्थात या दोन्ही गोष्टी श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा वापर होत असतो.

तेव्हा श्रद्धा म्हणजे काय याचा आपण प्रथम विचार करु.

संत साहित्यात तुकारामाचे नेहमी नांव घेतले जाते. तुकोबांची भगवंतावर गाढ श्रद्धा होती, विश्‍वास होता.

त्या श्रद्धेपोटी त्यांनी अभंग रचना केल्या, लोकांमध्ये परमेश्‍वर प्रेमाचा भाव उत्पन्न केला.

पण कांही दुष्मनांनी त्यांना त्रास द्यायला सुरवात केली. त्यांचा छळ आरंभिला. त्यांच्या अभंग गाथा इंद्रायणीत नेऊन टाकल्या. दुष्मनांना वाटले आपण तुकोबांना पराजीत केले. मात्र तुकोबा शांत होेते.

याही अवस्थेत त्यांचे चिंतन त्यांचे अभंग त्यांचे मुखातून बाहेर पडत होते. त्याचवेळी इंद्रायणीचे पात्रातून त्यांच्या अभंग गाथा तरत असल्याचे दिसून आले.

तेव्हा त्यांना वाटले देव तारी त्याला कोण मारी. या प्रत्यक्ष अनुभवातून व त्यांनी केलेल्या चिंतनातून त्यांची भगवंतावर श्रद्धा बसली, त्यांनी आपले अखंड आयुष्य या श्रद्धेवर घालविले.

आता अंधश्रद्धेचा विचार करु.

तुकोबा आपले अभंग सुकविण्यासाठी एक एक गाथा वाळवंटात कोरडी करीत होते. त्यांचे हे कार्य व विश्‍वास पाहून त्यांच्या पत्नीला त्यातील दोन गाथा काढून आपल्या कमरेला बांधाव्या वाटल्या.

इकडे या दोन गाथांची शोधाशोध सुरु झाली, त्यांनी आपल्या पत्नीस विचारले, तेव्हा तिने दिलेले उत्तर फार उद्बोधक वाटले.

ती म्हणाली, नाथ, मी रोज पाणी भरण्यासाठी विहिरीवर जाते. तेथील ओलाव्यामुळे तेथे फार घसरगुंडी झाली आहे. चुकून एखादे वेळी मी घसरुन पडले तर तुमच्या अभंगाप्रमाणे मला हे कासोटी लावलेले अभंग तरतील म्हणून मी हे अभंगाचे कागद कमरेला बांधले आहेत.

येथे या माऊलीची अंधश्रध्दा, पण खरी अनुभवाची श्रद्धा लक्षात येते.

तीचा नवर्‍यावर विश्‍वास होता. त्यामुळे माझ्यावर आलेली आपत्ती माझे पती दूर करतील. माझे रक्षण करतील.

हा दृढ विश्‍वास, श्रद्धा तेथे दिसून आली.

अशाप्रकारे प्रपंचात, व्यापारात, राजकारणात आपण कुणावर तरी श्रद्धा ठेवतो, तो सांगेल तशी कामे करतो.

एकाने एखादे काम केले तर अनेकजण अंधश्रद्धेने तेच काम पुढे करीत रहातात.

तेथे चिंतनाचा अभाव असतो. तेथे विचार जागृत नसतो. तेथे अंधश्रद्धा जन्म घेते.

त्यामुळे कधी कधी प्रपंचाची धुळधाण पण होवू शकते.

तेव्हा प्रत्येकाने विवेक जागृत ठेवून चिंतन करुन कर्म श्रद्धेने करीत जावे.

Leave a comment