शिवरायांची महान तत्वे

शिवाजी महाराज महान होउन गेले कारण त्यांची तत्वे महान होती.

त्यांनी त्या तत्वांचा ज्ञान, दर्शन, चारित्र्य यांचा अभ्यास केला व त्यांचे पालन केले.

ती तत्वे अशी-
1. खंबिरता : शत्रु कितीही मोठा असला तरी त्याला घाबरायचे नाही. त्यामुळे मुगल, निजाम, आदिलशहा या सारख्या मोठ्या विरोधकांवर त्यांनी मात केली. गनिमीकावा, प्रसंगी माघार घेवून शत्रुला भुलवून पुन्हा त्यांचेवर मात करणे या गुणामुळे महाराज महान झाले.

2. कष्ट करा : डोळस होवून जगा, डोळ्यासमोर उच्च ध्येय ठेवा. पवित्र नजरेने वावरत रहा. त्यामुळे महाराजांनी रयतेतील माता, भगिनींना अभय दिले. शत्रुच्या कडून नजराणा म्हणून आलेल्या स्त्रियांना मान सन्मानाने वागविले. त्यामुळे स्त्रियांमध्ये महाराजांची किर्ती पसरत गेली. कोणत्याही निष्पाप प्राण्यांचा बळी न घेता महाराजांनी आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक मंदीरात केला. महाराजांचे जवळ सर्वोत्तम राजनिती होती. त्यामुळे ते ओैरंगजेबाच्या कडेकोट बंधनातून सहिसलामत मुक्त झाले व त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.

3. कार्यविभागणी

कोणतेही महान कार्य एकट्याच्या जिवावर उभे राहू शकत नाही. त्यासाठी एका तत्त्वावर श्रद्धा असलेल्या मजबूत संघटनेची आवश्यकता असते. त्या संघटनेच्या प्रत्येकावर ठराविक कार्याचा भार सोपवून कार्याची विभागणी करणे आवश्यक असते. छत्रपतींनी स्वराज्याच्या कार्याची ही विभागणी अशा प्रकारे केली होती. अष्टप्रधान मंडळ हा त्याचा सर्वात धडधडीत पुरावा. प्रत्येकाला आपल्या मगदुराप्रमाणे कार्य सोपवून देणे हा फयालने
मांडलेला सिद्धांत त्याच्या कितीतरी अगोदर शिवरायांनी प्रत्यक्षात आणला होता.

4. अधिकारांसोबत जबाबदारीचे भान

प्रसंगी कितीही वरिष्ठ अधिकारी असला तरी त्याला माफी नव्हती. प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला सोडलं. अधिकार होता पण जबाबदारीचं भान सोडलं
, परिणाम शिवरायांनी खरडपट्टी काढली. पुढचा भाग आपणा सर्वांना माहीत आहे, वेडात मराठे वीर दौडले सात हा पुढचा प्रसंग आहे.

5. शिस्त

शिस्तीशिवाय एवढ्या प्रतिकूल काळामध्ये साडेतीनशे किल्ल्यांचा विस्तार असणारं स्वराज्य उभं करणं अशक्य होतं. शिवरायांच्या शिस्ती विषयीच्या अनंत कहाण्या आपण ऐकल्या असतील. एक छोटसं उदाहरण नजरेसमोर आणा. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाजीप्रभू देशपांडे आणि पाचशे बांदल सैनिक घेऊन शिवराय निसटले. किल्ल्याभोवती सिद्धीचा वेढा पडलेला. कडेकोट चौक्या-पहारे. रात्रीचा निबिड अंधार. धो-धो कोसळणारा पाऊस. पाचशे लोक एका छोट्याश्या ओढ्याच्या रस्त्याने पसार होतात
, तरी बाजूच्या शत्रूच्या चौकीला खबर लागत नाही. काय शिस्त असेल ती ! विचार करा 500 पैकी एखादा जरी पाय घसरून पडला असता तरी विशाळगडापर्यंत छत्रपती पोहोचले असते का? अशी लाखो उदाहरणं शिवचरित्रात आढळतात. किंबहुना शिस्त आणि स्वराज्य दोन्ही समानार्थी वापर वाटावेत इतके एकरूप शब्द आहेत.

6. आदेशाची एकवाक्यता

हा खरं तर तुम्हा सर्वांसाठी आणि आजच्या सत्ताधार्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा धडा आहे. आमच्याकडे दररोज जीआर बदलतात. नियम बदलतात. सामान्य रयतेच्या लक्षात येईपर्यंत नियम बदलेला असतो. छत्रपतींच्या स्वराज्यमध्ये तसं नव्हतं. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका
, हा आदेश संपूर्ण स्वराज्यामध्ये सारखाच, तितक्याच गंभीरपणे पाळला जाणारा.

7. कार्य दिशेची एकवाक्यता

योजना,योजक आणि उद्दिष्ट याची एकवाक्यता. कोंडाजी फर्जंद. पन्हाळा घेताना शिवरायांनी विचारलं, “किती गडी पाहिजेत?” कोंडाजी म्हणाला, “फक्त साठ.” सर्वांना या योजनेमध्ये गफलत दिसली. तरीही शिवरायांनी कोंडाजीच्या योजनेमध्ये ढवळाढवळ केली नाही. परिणाम, दुसऱ्या दिवशी पन्हाळ्याच्या बुरुजावर स्वराज्याचा भगवा फडकला होता.

8. स्वराज्याच्या हितासाठी जीवाचं लिंबलोण करणं, हा तर समस्त मावळ्यांचा अखंड ध्यास. न्हावी म्हणून जन्माला आलो पण छत्रपती म्हणून मरता येत असेल तर मी हजारदा मरायला तयार आहे असं म्हणणारा शिवा काशिद, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं, जीव देऊ पण इमान नाही, असं म्हणणारा मुरारबाजी देशपांडे. ही सगळी याच तत्त्वाने भारलेली माणसं होती. नाहीतर आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं हा उद्घोष तानाजीने केलाच नसता. स्वराज्य आणि स्वराज्याचं हित बघणं हे प्रत्येक मराठी माणसाचं आद्यकर्तव्य होतं. तो भाव त्यांच्या अंतकरणात शिवरायांनी रुजवला होता.

9. योग्य कामाचा योग्य मोबदला देणारा मध्ययुगीन भारतातला पहिला राजा. ठरलेल्या दिवशी रोख स्वरूपात पगार करणारा भारतातला पहिला राजा.सैनिकांना स्वतः पेक्षाही जास्त आपल्या राजावर विश्वास होता. प्रत्येक कामाचा योग्य मोबदला त्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याची जबाबदारी अत्यंत नेटाने पार पाडली जाई. माझ्या पाठीमागे माझ्या घरादाराची काळजी घेणारा माझा राजा आहे याची जाणीव प्रत्येक सैनिकाला होती त्यामुळे कुठलेही जिवावरचे संकट छातीवर घ्यायला प्रत्येक मावळा निधड्या छातीने तयार होता. चांगल्या कामाचं बक्षीस छत्रपती मला नक्की देतील हा विश्वास प्रत्येक नागरिकाच्या मनात होता, प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात होता. त्याच्या अनंत आख्यायिका आपल्याला पदोपदी मिळतात.

10. निर्णय निर्धारण प्रक्रियेचं मध्यवर्ती केंद्र हे छत्रपती होते. एकदा निर्णय झाला की त्याची प्राणपणाने अंमलबजावणी करणं एवढेच बाकीच्या अधिकाऱ्यांच्या हाती होतं. याचा अर्थ असा नव्हता की निर्णय हे एकटे छत्रपती स्वतःच्या मनाप्रमाणे घेत असत. ज्या गोष्टी विषयीचा निर्णय घ्यायचा त्या गोष्टीशी संबंधित सर्व अधिकारी व्यक्तींची मतं विचारात घेतल्यानंतर निर्णय घेतला जाई. एकदा का निर्णय घेतला मग मात्र त्यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार कोणालाही नसेल. स्वतः छत्रपतीलाही नाही.

11. आदेशाची एकरेषीय पद्धत
कोणत्याही निर्णयाचा प्रवास हा वरून खालपर्यंत एकरेषीय दिशेने निर्विघ्नपणे व्हायला हवा. जो पर्यंत कोणत्याही प्रकारचं अनपेक्षित संकट उद्भवत नाही तोपर्यंत त्या आदेशाच्या एकरेषीय प्रवासात कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये. मध्ये कोणी त्यामध्ये ‘ध’ चा ‘मा’ करू नये यासाठी हे तत्त्व महत्त्वाचं होतं.

12. योग्य व्यक्तींकडे जबाबदारी सोपवणे
जी जबाबदारी जो व्यक्ती पेलू शकतो ती जबाबदारी त्याच व्यक्तीच्या खांद्यावर सोपवलेली दिसते. त्यामध्ये कोठेही चूक झाल्याचे आपल्या लक्षात येत नाही. कोंढाणा घेण्यासाठी योग्य व्यक्ती तानाजीच आहे. सिद्धीला शिवबाच्या रूपात भेटायला जाण्यासाठी योग्य शिवा काशिदच आहे. गुप्तहेर खातं सांभाळायला योग्य बहिर्जी नाईकच आहेत. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जबाबदारी पाळण्यासाठी अत्यंत योग्य आहे. त्याच प्रमाणे किल्ल्यावरील 12 कारखान्यांची व्यवस्था योग्य व्यक्तीच्या हातातच असे.

13. कुठल्याही प्रकारचा भेदभाव रहित राज्यकारभार हे स्वराज्याचे सर्वात महत्वाचं लक्षण होतं. प्रत्येकाला स्वराज्याचे नियम पाळून आपला विकास करण्याचा अधिकार होता. संधी होती. शेतीसाठी मिळणारं पीक कर्ज असेल, शेतसाऱ्या मध्ये मिळणारी माफी असेल, देवस्थानची व्यवस्था असेल यामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, जातीभेद पाळला जात नसे. राजा हा रयतेचा पिता असतो. पिता लेकरांमध्ये भेदभाव करत नाही, हे तत्व स्वराज्यामध्ये तंतोतंत पाळलं जाई.

14. जोपर्यंत व्यक्तीची गुणवत्ता, क्षमता योग्य आहे तोपर्यंत ती व्यक्ती अधिकार पदावर असेल. कुठल्याही पदाचं स्वातंत्र्य जपायचं असेल तर त्याला कार्यकाळाची शाश्वती देणं हे व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं. हे तत्त्व स्वराज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात पाळलं गेलेलं आहे. फक्त गुणवत्ता हा एकमेव निकष असे.

15. नाविन्याची कदर

एखाद्याने नवीन शस्त्र शोधून काढलं, एखाद्याने नवीन तंत्र शोधून काढलं तर त्याचं कौतुक करणं. त्याला बक्षीस देणं. यामुळे नवनवीन संशोधनाला चालना मिळे. त्याचा अंतिम फायदा हा सर्वांनाच होत असे. शिवरायांनी स्वराज्यामध्ये सर्जनशील लोकांचं कायम स्वागत आणि कौतुक केलेलं आहे. यामध्ये कवी भूषण पासून कवी कुलेश यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश होतो. तलवार घडवणाऱ्या लोहारापासून तर रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांपर्यंत प्रत्येकाच्या प्रतिभेला मुक्त वाव स्वराज्यामध्ये होता.

16. उच्च प्रतीची नीतिमत्ता

प्राण गेला तरी बेहत्तर पण मी तत्वाने वागणं सोडणार नाही. अशा प्रकारचे संस्कार स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीवर होते. त्यामुळेच हिंदवी स्वराज्य हे फक्त रयतेच राज्य नव्हतं, तर ते नीतिचं राज्य होतं. न्यायाचं राज्य होतं. तत्वांचं राज्य होतं.

अशा या शिवाजी महाराजांच्या तत्वांना कोटी कोटी प्रणाम!

Leave a comment