शांती – सुखाचा मार्ग

एखादे ठिकाण गाठावयाचे असेल, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग असतात. काही अडचणीचे, खाच-खळग्याचे, तर काही राजमार्ग असतात. त्या मार्गाने माणूस आनंदात कमी वेळात पोहोचू शकतो.

आज प्रपंचात पण आपणास शांति हवी आहे व ती मिळविण्यासाठी अनेक मार्ग समोर आहेत.

कांहीजण पैशाने, श्रीमंतीने, गाड्या बंगले घेण्याने शांती मिळेल असे समजून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात.

काहींना वर्चस्व करुन, सर्वांना धाकात ठेवून शांति मिळविण्याचा छंद असतो.

अशा या शांतीकडे येणार्‍या अनेक मार्गाचे परिक्षण केले असता, लक्षात येते की, प्रपंचात शांती असणे हाच खरा सुखाचा मार्ग आहे.

प्रापंचिकाने विवेक जागृत करुन सुखाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.

हा मार्ग शोधत असताना मोह मायेची अहंकाराची झाडे झुडपे तोडावी लागतात.

पण मार्ग सुलभ करण्यासाठी त्यांना अलगद बाजूला करुन मार्ग चोखळणे करता आले पाहिजे.

ही कला ज्या विवेकी साधकाने आत्मसात केली. त्याचा प्रपंच शांतिदायक झाला असे समजावे.

ही जीवन जगण्याची कला ज्या साधकाने साधली त्याचा प्रपंच उत्तम झाला असे समजावे.

सुख हे प्रपंचाच्या गाडीचे आखरी स्टेशन आहे. त्या स्टेशनपर्यंत पोहचण्याचा राजमार्ग म्हणजे शांति होय.

ज्याने शांतीची वाट धरली, त्याला सुखाचे स्टेशन समीप आल्याचे लक्षात येते.

भराभर काम करुन, इतरांना दु:ख देवून, जीवनात कलह माजवून सुखाचे स्टेशन कधी सापडत नाही.

त्यासाठी मनाची शांति गरजेची आहे. ती संपादन करण्याचा प्रयत्न करु या..

Leave a comment