सौंदर्य, देखणेपणा, प्रेक्षणीय अशी ब्युटी पहाण्यासाठी माणसाजवळ तशी दृष्टी हवी असते.
या सौदर्याचे दोन प्रकार आहेत. बाह्य सौंदर्य व अंतर्गत सौंदर्य. तेव्हा सौंदर्याचा विचार करताना समोर द्वंद्व उभे रहाते.
अंतर्गत, बाह्य खरे सौंदर्य, बनावट सौंदर्य यातील फरक कळण्यासाठी त्या सौंदर्याकडे बघण्याची दृष्टी निरागस, निस्पृह असावी लागते. निरीक्षकाचे ठिकाणी विवेक असणे गरजेचे आहे.
पिवळे दिसते, लखलखते म्हणून एखाद्याने हवे तेवढे पैसे मोजुन पितळ सोन्याच्या भावाने खरेदी केले तर त्याची अवस्था दयनिय होईल. तो फसविला जाईल.
तेव्हा सौंदर्य हे बाह्य दिखाऊपणात नसते. तर आतील कसा मध्ये असते. ज्यावेळी ती तांब्याची तार विस्तवावर ठेवली जाईल तेव्हा त्याची सत्यता पटेल.
मनुष्य जीवनात अशा खूण गोष्टी समोर येतात. त्या ठिकाणी माणूस फसतो व नंतर पश्चाताप करतो.
तेथे लक्षात येते ‘‘काय भुललासी वरलीया रंगा’’
कोणताही निर्णय करण्यात उतावीळपणा असू नये. त्या वस्तुचे परीक्षण बारकाईने करावे. योग्य परीक्षा घेऊनच त्या वस्तुची किंमत करावी.
प्रपंचात पण आपण मुला-मुलींची लग्न लावतो. पण जे नुसतेच बाह्यरुपाकडे पाहून लग्नाला संमती देतात तेथे प्रपंच फसतो.
तेथे जेष्ठांची गरज असते. त्यांचे नजरेतुन बारीक सारीक गोष्टी पाहिल्या जातात व मग विवाह जुळतो. गुण जमतात, सौंदर्य खुलून दिसते.
सौंदर्य हे रंगावर अवलंबून नाही. सावळा विठ्ठल पण सर्व वारकर्यांना देखणा वाटतो. त्याचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पायवारी करतात व नित्यनियमाने वारी व्हावी यासाठी प्रार्थना करतात.
सौंदर्य हे संपत्तीवर अवलंबून नसते. गरीब घरातील चटणी भाकरी समाधानाचा ढेकर देते.
सौंदर्य हे माणसाप्रमाणे निसर्गात पसरलेले आहे. निसर्गातील सौंदर्य पहाण्यासाठी आपणास उन्हाळ्याची सुट्टी, सहल काश्मीर सारखी प्रेक्षणीय स्थळे शोधावी लागतात. तेथे खूप खर्चपण येतो व ते सौंदर्य कायम आपल्या ठिकाणी रहात नाही.
तेच सौंदर्य पहाण्याची दृष्टी असणारा माणूस खेडेगांवात राहून निसर्गाची किमया फुलाफळांचा बहर पाहू शकतो. पण यासाठी सौदर्य पहाण्याची दृष्टी असावी लागते.
ज्याला ही दृष्टी येते तो जीवनांत सुखी समाधानी होतो. सौंदर्य जर मनातील विचारावर अवलंबून असेल तर माणसाने मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या उक्ती प्रमाणे सौंदर्य पहाण्यास शिका, बाह्य सौदर्याला भुलू नका.