जे नाही, ते आहे असे वाटणे याला ‘संशय’ म्हणायचे.
मनुष्य जगत असताना तो नेहमीच मनांत काही संशय घेऊनच जगत असतो.
याला कारण म्हणजे वासना. प्रपंच करीत असताना इतरांकडून आपल्या काही अपेक्षा, आकांक्षा असतात, त्याजेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्या संशयरुपाने आपल्या समोर येतात व आपणाला आनंद अगर दु:ख देत असतात.
हा संशय सुप्त अवस्थेमध्ये समोर येतो. त्याला स्वप्नावस्था पण म्हणतात. म्हणजे माणूस नेहमीच स्वप्नावस्थेत जगत असतो.
आज अमुक एक गोष्ट करावयाची तर त्याचे स्वप्न झोपेत त्याच्या समोर उभे रहाते. ते इतके खरे वाटते की, आपण तेथे सत्य परिस्थितीत वावरत आहोत असे वाटते.
जे घडले नाही, घडत नाही व कुठे घडणार नाही तरीपण जे समोर उभे रहाते त्याला संशय असे म्हणायचे व त्याच्या पाठीमागे अखंडपणे जाणे, चालणे याला भूत लागणे असे म्हणतात.
अज्ञानी माणसे या संशयी वृत्तीची असतात. ती हलक्या कानाची, संकुचित दृष्टी असणारी, स्वार्थी अशी असतात. प्रपंचात वागत असताना इतरांचे दोषच ती माणसे पहात रहातात.
चांगला तांदुळ आणला असतो, पण संशयी माणूस यात गार नाहीना असा संशय घेतो व सर्व तांदुळ निवडण्याचा प्रवास करतो. कारण तेथे गारेचा संशय भूत रुपाने समोर उभा असतो.
घरात पांच माणसे प्रपंच करीत असतात. त्यांच्या प्रयत्नाने परीवार सुखाने नांदत असतो.
पण जेव्हा एखाद्याच्य मनांत दुसर्याच्या वागण्याबद्दल कलुशित भाव निर्माण झाला की, त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
प्रत्येक ठिकाणी त्याच्या वागण्यावर संशय घेतला जातो. त्याचे बोलणे, त्याचे फिरणे, त्याचे खाणेपिणे या सर्वांवर संशय घेतला जातो.
मग स्वप्नात देखील जी गोष्ट घडली नाही, घडणार नाही ती समोर उभी रहाते. याला ‘संशयकल्लोळ’ म्हणतात. नाटकाच्या रुपाने हा कल्लोळ प्रेक्षकांचे समोर उभा रहातो. सर्व प्रेक्षकांना त्या नाटकाच्या कल्लोळामुळे रडू येते तर कधी हसून हसून पोट दुखते.
संशयाचे भूत हे प्रपंचातील भूत आहे, पात्र आहे याला जपून वागविले पाहिजे. प्रत्येक माणसाचे मनात हे भूत कार्यरत असते. त्या एका पात्रा पाठीमागे जग फिरत असते.
माणसाने संशयी असावे पण त्याबरोबर विवेकी असणे गरजेचे आहे.
जर तो माणूस विवेकी असेल तर तो चांगले विचार मनाच्या पटलावर पाहील, त्या विचारांचे चिंतन, मनन करेल व योग्य पद्धतीने आपली दिनचर्या घडवेल.
पण जर हे संशयाचे पात्र अविवेकी पणाने वागू लागले तर सुंदर असा प्रपंचाची धुळधाण झाल्याशिवाय रहाणार नाही.
संशय असणे गरजेचे आहे, पण विवेक त्याबरोबर असणे गरजेचे आहे.
संशय व विवेक बरोबर चालत असतील तर संशयरुपी भूत माणसाला त्रास देणार नाही.