संसार म्हणजे सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनी एकत्र येऊन करावयाचा प्रपंच. येथे संतांनी संसाराचे सार सांगितले आहे.
संसारात वावरत असताना आपण त्यातील साराचा कधीच विचार करीत नाही. मात्र संसार हा सुखकारक आहे. असे कायम मनामध्ये धरतो. तेथे माणसाचा अपेक्षा भंग होतो.
त्याची अपेक्षा असते. मला दुसर्या सारखे वैभव असावे, मुलेबाळे असावीत, श्रीमंती असावी, गाडी घोडे असावेत, समाजात मानसन्मान मिळावा पण हे सर्व ज्याचे ठिकाणी आहे अशा लोकांचे जवळ जावून त्यांच्याशी चर्चा केली तर दिसून येते की आपणाला ज्या गोष्टी सुख देतील अशा वाटतात त्या गोष्टी ज्यांचे जवळ आहेत. ते तरी कुठे समाधानी आहेत.
प्रत्येकाची काहीतरी कमतरतेची तक्रार असते. कुणाला शाररीक अपंगत्व आलेले असते. कुणाला मानसिक नैराश्य आले असते. एकूण हा प्रपंच, हा संसार जो सुखकारक म्हणून आपण करतो त्याचे सारं दु:खच आहे.
पांच जणांनी मिळून करावयाचा तो संसार, प्रपंच तो कधी एका विचाराने होत नाही. तेथे फाटे फुटतच असतात. तेव्हा विवेकाने प्रपंच सोडून परमार्थात जाणे यामध्ये सुख आहे का ? याचा माणूस विचार करु लागतो.
त्यावर चिंतन मनन करतो, तेथे त्यांचे लक्षात येते. जर तु संसार जिंकला तर या जगतात तु मोक्ष प्राप्ती करु शकशील.
तेव्हा विवेकाने, विचाराने संसाराचे सार, असार संसार सोडावा व विधात्याला शरण जावे, त्याची भक्ती करावी असा आहे.