या पंक्तीत ‘अंतरे’ याचा अर्थ “अंतर्मने” असा घ्यावा वाटतो.
म्हणजे माणसाने जीवन जगत असताना अनेक माणसे जोडावीत-त्यांची मने ओळखावीत व अनेकांशी एकरुप होवून जीवन जगावे.
इतरांच्या भावनेला, विचारांना मान देवून आपण जगावे असा अर्थ या उक्तीतून समोर येतो.
प्रपंचात माझे तेच खरे, मी सांगतो ते बरोबर आहे असे म्हणणारा अहंकारी होतो व त्या अहंकारा पोटी तो इतरांच्या विचारांना भावनेला मान देत नाही. त्यामुळे तो जनसमुदयात असून नसल्यासारखा होतो.
तेव्हा लहान बालकापाशी गेल्यावर त्याला काय हवे काय नको ? हे पहावे व त्याला ते द्यावे.
प्रपंचात येणार्या अनेक व्यक्ती त्यांची पात्रता लक्षात घेवून त्यांचा मान ठेवण्याचा प्रयत्न करावा.
प्रपंचाच्या तीसर्या टप्यावर आल्यावर सर्वांमध्ये असून आपल्या स्वत:मध्ये रममाण होण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे समाजात अनेक लोकांच्या अंत:करणामध्ये त्या व्यक्तीचे प्रतिबींब सामोरे येते.
माणसाने कधी एकलकोंडे राहू नये. जरी वेळ आली तरी मनाने, चिंतनाने सर्वांचे मनन चिंतन करावे. त्यामुळे एक दुसर्या मध्ये पडलेले अंतर कमी होत जाईल व अनेक चांगल्या माणसांचा समुदाय तुमच्या पाठीशी उभा राहिल.
पुष्कळ लोकांच्या अंत:करणाचे, अंतर्मनाचे रक्षण करावे. तरच आपण स्वत:चे संरक्षण करु शकतो.
जीवनात प्रत्येकाने ‘राखावी बहुतांची अंतरे’ हा मंत्र मनात कोरावा.