प्रवचनाचा अमृतानुभव

ज्या गोष्टींमुळे चैतन्य निर्माण होते, त्याला अमृत म्हणतात. ना तुम्ही, ना मी ते पाहिले व चाखले. पण चातुर्मासांनंतर जे चैतन्य निर्माण झाले, जो अनुभव आला त्यामुळे खरं अमृत काय असते, व्याख्यान काय असते याचा अनुभव आला आणि तोच अमृतानुभव होय.

चातुर्मासातील चार महिने नित्यनियमाने सकाळी 10 ते 11 या वेळांत गुरु भगवंत सकल संघाला जे प्रवचन देत होते. त्यातुन जैन धर्माची तत्वे, आचार, विचार लोकांचे मनामध्ये ठसत होते. त्यातून रोज ज्ञानात भर पडत होती.

साधु संतांचे सानिध्य, सकल संघांचे एकत्रीकरण या गोष्टींमुळे निद्रीत असलेला संघ अमृतपान करुन चैतन्यमय झाल्याचे भासत होते व हा भास नसून अभास आहे, याची खात्री पटत होती.

खरोखर कधीच डोळ्यांना पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व वाणीने बोलले गेले नाही, असे चैतन्यमय भाव प्रकट झाला. तो भाव म्हणजेच अमृतानुभव होय.

या चातुर्मासानंतर कित्येक साधकामध्ये परिवर्तन घडले, कित्येकांचे संसार सुखाचे झाले. कित्येकांना सुखी संसाराची वाट सद्गुरु सानिध्यात दिसली. हा एक अमृतानुभवच होय.

या अमृतानुभवा सोबत अनेक वृत्तीत फरक झाला. नम्रता जागृत झाली. हे अमृत देणार्‍या देव गुरुला वंदन करण्याची वृत्ती निर्माण झाली. अहंकाराची प्रचिती आली. निर्मोही जीवन कसे जगायचे याची जाणीव झाली. नियम घेणे व त्याप्रमाणे अनुकरण करीत रहाणे याची सवय झाली.

या अमृतानुभवाने मला तू कर्ता नाहीस कर्ता करवीता तो परमेश्‍वर आहे. उगाच अहंकार करु नकोस असा अनुभव दिला.

या ठिकाणी त्या परमात्म्याचे ऋण मी कबुल करतो व त्या ऋणात राहून त्या भगवंताची सेवा सतत घडो ही प्रार्थना करतो.

चातुर्मासानंतर हा अमृतानुभव प्रत्येकाने घ्यावा असे मला मनोमन वाटते.
श्री सद्गुरु स्वामी नाथाय नम: ॥

Leave a comment