प्रपंच खरा कि खोटा

पांच जणांनी केलेले कार्य याला प्रपंच म्हणतात व एकट्याने करावयाचा त्याला परमार्थ म्हणतात.

पांच जणांनी करणार्‍या कृतीत अहंभाव आला. मी..- तू.. पणाची बाजु आली. मी मोठा तू छोटा हा अहंभाव आला, त्यामुळे ता प्रपंच बाहेरुन आकर्षक वाटला तरी सुक्ष्मात तो क्लीष्ट असतो.

प्रपंच झाकल्या मुठी सारखा असतो. जोपर्यंत मुठीची पांच बोटे एकमेकांना धरुन असतात तोपर्यंत त्याचे गुढ लोकांचे लक्षात येत नाही. पण एकदा का मुठ उघडली की मी मोठा तू लहान ही मोजणी सुरु होते.

प्रपंचाचे पण तसेच आहे. परमेश्‍वराने प्रत्येक व्यक्तीमध्ये कांही चांगले व कांही वाईट (गोष्टी) गुण दिलेले आहेत. चांगल्या गोष्टी बरोबर एखादी कमतरता ठेवली असते व त्या कमतरतेला धरुन प्रत्येकजण प्रपंचात असमाधानी रहात असतो.

त्यामुळे प्रपंच खरा की खोटा याचे उत्तर थोडे अवघड ठरते.

मोठमोठ्या संतांनी, समर्थांनी विचार केला व आपली मते मांडली. यांत कोणीही प्रपंच वाईट आहे, खोटा आहे असे मत दिले नाही व तो फार चांगला आहे असा सल्ला पण दिला नाही.

काडीपेटी माणसाचे हातात दिली व विचारले ही चांगली आहे कि वाईट? त्याप्रमाणे प्रपंच करण्याची तुम्हाला संधी दिली तेव्हा त्या संधीचे सोने करत परमार्थ साध्य करावयाचा कि, प्रपंचात गुंतुन जावून हा जन्म वाया घालवायचा हे विवेकाने ठरवायचे आहे.

काडीपेटीतील काडीने चूल पेटवून पोटाची भूक भागवली जाईल. अंध:कार नष्ट करुन जिकडे तिकडे लखलखीत प्रकाश पसरवला जाईल. तर ती काडीपेटी कधी माणसाचे हातात पडली तर तो प्रपंचाची राख रांगोळी करुन टाकील.

यामध्ये काडीपेटीचा कांही दोष नाही. तो दोष असतो, ती ज्या व्यक्तीच्या हातात पडते त्या व्यक्तीचा.

तेव्हा प्रपंचाला नावाजायचे कां त्यातून अलिप्त होवून परमार्थाकडे जायचे हे साधकाचे हातात आहे.

पांच बोटापैकी दोन बोटे प्रपंच घातक आहे असे म्हणतात. या भांडणात प्रपंचाची गाडी सूरु असते तेथे विवेकी माणसाने आपला विवेक जागृत करणे गरजेचे असते.

तो विवेकी माणूस चिंतन, मनन करीत आपल्या विवेक जागृत करणे गरजचे असते. तो विवेकी माणूस चिंतन मनन करीत आपल्या शक्तीचा उपयोग करुन मत कोणाच्या बाजूला टाकायचे हे ठरवितो व प्रपंचातून सही सलामत मुक्त होतो.

प्रपंचात सर्वांवर राज्य करतो. येथे प्रपंचात कोण खरा कोण खोटा असे तंटत बसण्यात अर्थ नसतो. तेथे विवेक जागृत करुन प्रपंचातील चांगल्या गोष्टी पहा, त्यांचा अभ्यास करा. वाईट गोष्टींवर मनांत विचार ठेवा व त्या गोष्टीवर मात करण्याचा संकल्प करा.

जो उत्तम प्रपंच करतो तोच उत्तम परमार्थ करु शकतो.
प्रपंच ही परमार्थाची तालीम आहे. या तालमीत साधकाला परमार्थाचे धडे शिकविले जातात, निरनिराळे डाव शिकवले जातात व विवेकी साधक योग्य वेळ येताच योग्य पद्धतीने हे डाव जिंकत जिंकत प्रपंचातून परमार्थात प्रवेश करतो.

या ठिकाणी मला अवर्जुन हेच सांगायचे आहे.

प्रपंच खरा की खोटा हा वाद करीत बसू नका. बाह्य सौंदर्याचे नादी लागू नका, गुण पहा, गुणानुग्राही बना, प्रपंचातील चांगल्या गुणांची मुठ बांधा व त्यावर ठामपणे अंगठ्याची मोहर लावून ठेवा, तर तो प्रपंच. चांगले असेच त्यांत सापडेल. हा प्रापंचिकाचा ठेवा अनमोल आहे. त्याला इकडे तिकडे ठेवू नका.

ह्रदयाचे कोंदणात जपून ठेवा व त्याचा वापर करा. मग तुम्ही म्हणणार नाही प्रपंच खोटा की खरा !

Leave a comment