‘अति तिथे माती’, ‘तोलून मोलून घ्यावे’, ‘अंगाचा बोंगा’ अशा म्हणी समोर येतात. तेव्हा मनांत विचार येतो प्रमाणात सर्व काही असावे.
माणसामध्ये हाव हा दूर्गुण असतो. एकदा का एखादी गोष्ट मिळाली की त्याला त्या गोष्टीची हाव उत्पन्न होते. उदा. पैसा कमविणे, तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत जर काय करीत असेल तर, पैसा मिळविणे. त्याला तो छंदच लागतो.
गरीबाला पोटाची खळगी भरण्यासाठी, श्रीमंताला तिजोरी भरण्यासाठी, राजकारण्यांना मत मिळविण्यासाठी पैसा मिळविण्याचा छंद लागतो.
त्या छंदातून तो अलिप्त होऊ शकत नाही. जसे औषध म्हणून एक पेग दारु घेणारा हळू हळू दारुच्या इतक्या आधिन होतो की तो त्यातच जीवन संपवून टाकतो. घरादाराची वाट लावतो.
येथे गुरुजींनी सांगितलेले वाक्य नजरेसमोर येते ‘प्रमाणात सर्व काही असावे’.
जन्माला आलेल्या बालकाचे वजन करतात, त्याची उंची मोजतात व म्हणतात सर्व काही प्रमाणात आहे. जर वजन वाढत वाढतच गेले तर तो गलेलठ्ठ बनतो. या उलट अति कृष्ट, कुपोशित, वाढ खुंटल्यामुळे कुपोषित होतो. तेथे डॉक्टर म्हणतात, ‘‘प्रमाणात सर्व काही असावे.’’
हे प्रमाणात ठरविणारे कोण ? चिकित्सक, अभ्यासक, वैद्य हे अनुभवाने सांगतात की, हे प्रमाणात आहे. तर हे प्रमाणात नाही.
येथे विवेक , चिंतन महत्वाचे आहे. समोर ताट भरुन पदार्थ आहेत. म्हणून अजुन द्या म्हणणारा कसे वजन प्रमाणात ठेवील?
शुल्लक गोष्टीचा त्रास करुन तापसी माणूस क्रोधी बनतो व आपल्या वागण्याने इतरांची न भरुन येणारी हानी करतो.
तेथे पण माणसाने विवेकी बनुन क्रोध प्रमाणात करावा, असे म्हटले आहे.
नवी कोरी भारी गाडी ताब्यात दिली व ड्रायव्हरने अती वेगाने पळविली तर कुठेतरी ठोकर तर खाणारच व न भरुन येणारे नुकसान होणार.
तेव्हा डोळ्यासमोर नेहमीच असुद्या, ‘प्रमाणात सर्व काही असावे.’