परीक्षा

परीक्षा, कसोटी-ओळख ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून माणसाला वेळो वेळी जावे लागते.

माणसाप्रमाणे दगडांना, लोखंडाला, धातूंना परीक्षेस सामोरे जावे लागते. तेव्हा परीक्षा हा काय प्रकार आहे, याचा आज विचार करणार आहोत.

माणसाचे मन सृष्टीतील वस्तु सौंदर्य अफाट पसरलेले असते. त्यामुळे मनांत एक प्रकारची आसक्ती किंवा विरक्ती उत्पन्न होते. मनांत द्वंद्व उभा रहाते. खरे काय, योग्य काय, अयोग्य काय याचा प्रश्‍न समोर उभा रहातो. अशावेळी त्याला योग्य उत्तर देण्यासाठी काही गोष्टींची गरज असते व त्या गोष्टी ज्यांच्याकडे असतात, त्यांना परीक्षक म्हणून नेमले जाते.

साधूसंत हे प्रापंचिकांचे परीक्षक आहेत. तर गुरुजन हे विद्यार्थ्यांचे परीक्षक होत. जेष्ठ नागरिक हे प्रपंचातील कसोटीच्या वेळी उभे रहाणारे परीक्षक असतात. परीक्षा ही काय गोष्ट आहे याचे एक उदाहरण पाहू.

पुष्कळ वर्षापूर्वी गुजराथ मधील पालीताणा या ठिकाणी सुंदर मंदिर उभारण्याचे काम चालू होते. मंदिरासाठी अनेक दगडाच्या खाणीतून दगड डोंगरावर चढविले जात होते. एक मोठा दगड पायथ्यापाशी तसाच पडून होता. सर्व दगड मागून येऊन पुढे पुढे पायर्‍या चढत होते.

एक दिवस कारागिर मंदिराचे काम पहाण्यासाठी तेथे आला. डोंगर चढण्यापुर्वी त्याने डोंगराला व तेथेच पडलेल्या भव्य शिलेला नमस्कार केला. काय चमत्कार झाला, त्या कारागिराला त्या शिळेमध्ये आदिनाथ भगवंताची मूर्ति दिसली व तो तिथेच थांबला. त्याने आपले सर्व कौशल्य पणाला लावून त्या शिळेतून आदिनाथ भगवंताची मूर्ती साकार केली.

आज हजारो वर्ष झाली ती मूर्ति डोंगरावर विराजमान आहे. हजारो लोक दरवर्षी मूर्तिचे दर्शन घेत आहेत. ही त्या शिळेने (दगडाने) दिलेली परीक्षाच होती.

येथे लक्षात येते की परीक्षेला किती महत्व आहे. ही परीक्षा जशी दगड धोंड्यातून शिळेची होते तशी हिरे माणिक, मोती, सुवर्ण, चांदी यांची सुद्धा केली जाते व त्याप्रमाणे त्यांचे मोल ठरले जाते. तेव्हा मानवी जीवनात काय किंवा सृष्टीत काय किंवा पंचमहाभूतात काय परीक्षेला फार महत्य आहे.

मोठमोठ्या उद्योगपतींनी बाजार पेठेची परीक्षा घेतली व आपली उत्पादने बाजारात आणली. त्यांना चांगला भाव मिळाला व असे उद्योगपती धनाढ्य संपत्तीचे मालक झाले.

परिक्षा म्हटले की पास नापास हे ठरलेले असते. तेव्हा एक सूत्र लक्षात घ्यावयाचे असते ते असे सर्वांना परीक्षेस सामोरे जायचे असते. ज्यांना यश मिळते त्यांनी अहंकारानी फुगायचे नसते व ज्यांना अपयश येते त्यांनी अपयशाने नाराज न होता यशाच्या पायरीवर उभे रहावयाचे असते.

मात्र परिक्षेची वेळ येताच प्रत्येकाचे मनांत भिती उत्पन्न होते. येथे परीक्षा ही एक संधी आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

परीक्षा पास झाला तर परी मिळेल, नापास झाला तर रिक्षा घेऊन देईन.

यश आले तर पुढचा मार्ग धरावयाचा व अपयश आले तर चूक शोधायची व मार्ग सुधारत सुधारत जायचे. ही गोष्ट माणसाने ध्यानांत घेणे गरजेचे आहे.

या परीक्षेसाठी कांही सूत्रे लक्षात घेणे गरजेचे असते, ती सूत्रे अशी –

1. स्वत: ला ओळखा,

2. सर्वां ठायी एकच एक परमेश्‍वर आहे हे विसरु नका.

3. सर्व सुखी होवोत ही प्रार्थना रोज करा,

4. कोणाला दुखवू नका,

5. मद, मोह, माया, मत्सर या पासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा,

6. गोड बोला,

7. जरुर तेथे मोैन पाळा,

8. प्रपंचाकडे तिर्‍हाईता सारखे पहाण्याची सवय करा,

9. इतरांना मदत करण्याची संधी येताच त्या संधीचा फायदा करुन घ्या.

या गुणसुत्रातून परमेश्‍वर प्रत्येकाची परीक्षा घेत असतो व त्याचे फळ देत असतो.

आयुष्यात आपण परीक्षा देत देत परीक्षक बनावे व उत्तम गुण देता घेता प्रपंच्याच्या पुढच्या पायरीवर जावून बसावे.

Leave a comment