जीवनात माणसाला अनेक ठिकाणी परीक्षा द्याव्या लागतात.
लहानपणा पासून छोटा शिशु पासून डिग्री घेईपर्यंत तो दरवर्षी परीक्षा देतच असतो. तेव्हा हा परीक्षा काय प्रकार आहे. याबद्दल माझ्या डोक्यात विचार आला.
मी धाडस करुन त्या दिवशी वडीलांनाच तो प्रश्न विचारला परीक्षा म्हणजे काय?
एक सापशिडीचा खेळ मला आवडीचा वाटे. लहानपणापासून तो खेळ मी खेळत असे तेव्हा वडीलांनी परीक्षेचे स्पष्टीकरण त्यांचे भाषेत दिले ते असे.
ते म्हणाले हे बघ आता तु करता सवरता झाला आहेस. तुझे लग्न लावून द्यावयाचे आहे. तेव्हा येथे तुला परीक्षा द्यावी लागेल. येथे जर तु पास झालास तर तुला परी मिळेल. तुझा प्रपंच आनंदात सुरु होईल व जर नापास झालास तर परीच्या ऐवजी रीक्षा घेवून द्यावी लागेल.
विचार कर तुला परी हवी का रीक्षा.
तुझ्या आवडत्या खेळाप्रमाणे पास होवून शिडीने यशाचे शिखर गाठावयाचे का सापाच्या तोंडात जावून अधोगतीने नरकात जावून बसायचे.
तेव्हा मला वाटते तुला परीक्षेचा अर्थ समजला असेल.
परीक्षा ही एक कला आहे. तिच्या सहाय्यने माणूस यशाची शिखरे चढत जातो.
परमार्थात पण परीक्षेचे महत्व आहे.
परमेश्वर साधकाची न कळत परीक्षा पहात असतो.
असेच परीक्षा पहाण्यासाठी परमेश्वराने माणसाला एकदा एक दगड दिला व त्याला सांगितले हा दगड घेवून तू पृथ्वीवर जा व त्याची काय किंमत होते ते येवून मला सांग. पण लक्षात ठेव तो कोणत्याही किंमतीत विकू नकोस.
त्याप्रमाणे माणूस दगड घेवून खाणीच्या मालकाकडे गेला तेथून मुर्तिकाराकडे गेला, तेथून तो सराफा कडे गेला. तेथून तो हिर्याच्या दुकानदाराकडे गेला. प्रत्येकाने त्या दगडाचा परीक्षा करीत करीत शेवटी त्या दगडाला अनमोल असे मोल देवू केले.
तरीपण त्या माणसाने तो दगड विकला नाही. तेथे त्या दगडाची किंमत आणखीन वाढत गेली.
हाच तो दगड, म्हणजे मनुष्यजन्म परमेश्वराने शून्य किंमतीत माणसाला दिला आहे. व त्याचा तो परीक्षा पहात आहे. या फुकट मिळालेल्या देहाला आसक्तीने कुठे आपण विकतो काय?
याचा तो शोध घेत असतो तेव्हा आपण या खड्याचे, दगडाचे, जन्माचे मोल लक्षात घेवून त्याची निगा ठेवायची, का त्याला मातीत विलीन करावयाचे. हे आपण ठरवायचे आहे.
चिंतन करा, जीवन बहुमोल आहे. ते परत परत मिळणार नाही. तेव्हा चांगल्या परीक्षका कडून त्याचे मोल समजावून घ्या व त्याचे योग्य मूल्य मापन करा.