पालवी

निसर्गात पालवी हा शब्द बर्‍याच वेळा घेतला जातो.

बी रुजले थोडी पाने दिसू लागली, अंकूर फुटू लागला, कळ्या उमलू लागल्या, फुले उमलू लागली, फळे लागली की आपण पालवी फुटली असे म्हणतो.

त्या ठिकाणी बिजाचे रोपण व्यवस्थित झाले असा अर्थ होतो.

पालवी ही जशी निसर्गात आपण पहातो तशी प्राणीमात्रात पण दिसून येते. मुले मोठी होतात वयात येतात. समजूतदार होतात, मिसुरडं दिसू लागते. त्यावेळी म्हणतात पालवी फुटली, समज आली.

उतार वयात अनुभवामुळे माझेच म्हणणे खरे असा अग्रह धरणारे जेष्ठ ज्यावेळी विचारांती कबूल करतात, माझे चुकले तुम्ही बरोबर आहात. तेव्हा इतर जण म्हणतात या म्हातार्‍याला पालवी फुटली, त्याने त्याचा हट्ट सोडला.

असे पालवीचे विविध अर्थ आपणास निसर्गात व माणसात दिसून येतात.

बर्‍याच कष्टाने, प्रयत्नाने एखादी गोष्ट ज्यावेळी साध्य होते, त्यावेळी लोक म्हणतात याच्या प्रयत्नाला पालवी फुटली.

प्रपंचात पण आपल्या मनाला समाधान देणारी, आत्म्याला आनंद देणारी एखादी घटना घडताना दिसते तेव्हा म्हणतात “देवाचिये दारी उभा क्षणभरी, तेने चारी मुक्ती साधियेल्या.”

प्रयत्नांती परमेश्‍वर हा पण अध्यात्मातील धागा पालवी या वचनाची साथ देतो.

अशी पालवी आपल्या जीवनात फुटावी यासाठी संत म्हणतात तसे पेराल तसे उगवेल. चांगली फळे हवी असतील, तर चांगले बी पेरावे लागते.

जीवनात आनंदाचे झरे वाहू वाटत असतील तर कुटुंबातील माणसांना एकमेकांची किंमत, अस्तित्व याची जाण होणे गरजेचे आहे.

कांही रोपे अशी असतात की त्यांना एकदा लावले तर त्यांचेकडे पुन्हा कधी बघावे लागत नाही. ती आपोआप फुलतात, त्यांना फळे लागतात.

पण कांही अशी नाठाळ रोपे असतात, कि त्यांना कधी बहर येत नाही. पालवी फुटत नाही. डॉक्टर ज्या प्रमाणे नाडी तपासून निदान करतो . त्याप्रमाणे निसर्गात पण पालवी पाहून त्या रोपातून, पुष्प, फळं कशी निर्माण होणार याचा अंदाज येतो.

प्रत्येक गोष्टीला योग्य काळ, वेळ यावी लागते तेथे या सर्व गोष्टींची सांगड घातली जाते.

येथे पण पालवी फुटल्यानंतर आपला विवेक जागृत होने गरजेचे असते. उगाच पालवी फुटली म्हणून कळ्या तोडायच्या व चांगली फुले दिसली म्हणून तोडून पायदळी तुडवायची ही वृत्ती बरोबर नाही.

परमार्थात या पालवीतून निर्माण होणार्‍या फुलांचा हार बनवून तो परमेश्‍वराला अर्पण करावयाचा असतो. तेव्हा आपण सर्व मंडळी विवेकी आहोत.

या वृद्धापकाळात देखील आपल्या या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटू शकते. हे लक्षांत घ्या, समज मनांत उमटवा.

दगडाला पण देवपण येऊ शकते.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल गळे, या उक्तीप्रमाणे आयुष्यात येणार्‍या संधीचे (पालवीचे) फळ घ्यावे. आलेली पालवी चुकून खुडून न जाईल या कडे लक्ष द्यावे .

निसर्गाचे पर्यावरण राखण्यासाठी पालवी जपावी निगा राखावी.

Leave a comment