आपल्या मनाची अवस्था कशी असते हे या उक्तीतून सांगितले आहे. संत म्हणतात, मन करा रे प्रसन्न कारण ते सर्व सिद्धीचे कारण आहे. ते मोठे खोडकर, चंचल आहे. ते मनच गुरु आहे. कधी ते शिष्यपण होते. मनावरच आपली उर्ध्वगती की अधोगती आहे, हे अवलंबून असते. तेव्हा मनासारखे अन्य दैवत कोणतेच नाही.
असे हे मन दैवत आहे. ज्याते मन शुद्ध नाही, निर्मख नाही त्याचे जीवनांत प्रसन्नता कोठून येणार. जेथे पाणीच गढूळ आहे, तेथे उपदेश रुपी साबण काय काम करणार? तो उपदेश फोल ठरतो. तेव्हा मनाला स्थिर करा. ते स्थिर झाल्यावर चित्त शुद्धी होईल व सर्व सिद्धीप्राप्त होतील. मन हा देहाचा प्राण आहे. प्राण निघून गेल्यावर देहाकडून कोणतेच काम होत नाही. तेव्हा आपण जीवन जगत आहोत, तो पर्यंत ते मन आनंदी, प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
जसे पाण्याशिवाय पीक नाही. तसे मनाशिवाय जीवन नाही. ज्याप्रमाणे मानांत भाव येतात. त्याप्रमाणे जीवन आकार घेते. शुद्ध आचार विचार मनातूनच बाहेर पडतात. तेव्हा मनांतील चांगले भाव प्रकट होण्यासाठी मनाला नामाची जोड द्या व त्याचे सहवासात दुष्ट विचारांना बाहेर काढा. मन शुद्ध असेल तर शत्रुदेखील मित्र बनतात. असाध्य गोष्टीपण साध्य होतात. जेव्हा मनाला नामाची संगत होते.
जीवनातील सुख-दु:ख हे मनाचे खेळ आहेत. आनंद मिळवायचा असेल तर मनाला नामाशी जोडा, अखंड नामस्मरणात रहा. ते खोडकर बाळ आहे त्याला सैरा-वैरा पळू देवू नका.
जीवनांत, प्रपंचात मान-सन्मान अपमान वेळोवेळी होत असतात. त्याची जाणीव मनाकडून आपणाला होते, तेव्हा ती जाणिवच नष्ट करण्यासाठी मनाला स्थिर करा, शुद्ध करा व वितरागी बना. त्यासाठी साधु-संताचा सहवास शोधा व चिंतनाने मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. या चंचल मनाला, या खोडकर बाळाला एकटे सोडू नका. ते एकटे असताना कुठे वहात जाईल हे सांगता येणार नाही. तेव्हा त्याला नामाची संगत घालून द्या. नामाच्या अजपा जपामध्ये गुंतवा. तेथे ते स्थिर होईल व सर्व सिद्धी प्राप्त होतील. चंचल मनांत अहकार उत्पन्न होतो तो माणसाला अधोगतीकडे नेतो. तो अहंकार नष्ट होण्यासाठी जेथे शांती आहे त्याठिकाणी जाण्यासाठी चिंतनात मन लावणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी नामाचे जोडीने मन अहंकार रहित होईल व तेथे मनावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. सर्व सिद्धी प्राप्तीसाठी मनाला क्षमा प्रवृत्तीकडे जाण्याची गरज असते. ती प्रवृत्ती होण्यासाठी मनाला चिंतनातून नामस्मरणातून नामाच्या अनुरुंधनात ठेवणे गरजेचे असते ते प्रसन्न मना शिवाय होत नाही. तेथेही नामाची व मनाची भेट अपेक्षीत असते. या अवखळ मनावर प्रभुत्व मिळविणेसाठी रोज नित्यनियमाने चिंतन करा. त्या मनाला नामाचा ब्रेक लावा, तर तुमची प्रपंचाची गाडी निर्धोक पुढे जाईल. मनाला आसक्तीत गुंतवून ठेवू नका. मनाला कठोर करा. मोह, मायाच्या जालात गुंतवू नका. आहिक सुख, लालसा सोडून परमानंद मिळण्यासाठी मनाला चिंतनाची साथ द्या.
सर्वांना एकच विनंती, मिळालेल्या आयुष्याचा नाश करु नका. आपले मन, चित्त शुद्ध करा. जीवनाच्या व्यापारात मनाच्या जोडीने उत्तम व्यवहार करावेत व बहुमोल समाधान प्राप्ती करावी. विश्वव्यापक परमेश्वराची सेवा घडावी यासाठी मनापासून प्रयत्न करावा. असाध्य ते साध्य घडून येईल.
माणसाने मनाच्या आधीन होवू नये. मन हे घात करणारे असते. ते सैरावैरा धावत असते, यासाठी मनाला नामाच्या, संतांच्या संगतीत जोडा. त्यामुळे तुमचे समाधान होईल. तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होतील.
मन वडाळ वडाळ.. त्याला द्या संगत नामाची !
