महत्व कशाला, देहाला की कपड्याला

वैद्यकिय सेवा खेड्यात देत असताना अनेक किस्से समोर आले. असाच एक दिवस मी रुग्ण तपासणी करीत होतो.

अचानक कांही माणसे गडबड करुन आतं आली. मी डोकावून पाहिलं तर समोर एक अलिशान गाडीतून एका माणसाला उतरवित होते, त्याच्या अंगावर गाडी प्रमाणे शुभ्रभारी कपडे होते पण ती सर्व वस्त्रे रक्ताने माखली होती.

कोठेतरी त्याला मोठी जखम असल्याचे लक्षांत येत होते. म्हणून समक्ष पहावे म्हणून मी त्याला टेबलवर घेतले. माझा मदतनीस त्याचे कपडे काढू लागला. कांही ठिकाणीते घट्ट अवळून बसले होते. तेथे तो कात्री वापरुन कपडे बाजूला करीत होता. त्यावेळी अजुबाजूची माणसे म्हणत होती थोडं बेतानं एवढे भारी कपडे आहेत. त्यांना कपड्याची किंमत पडली होती तर त्याची बायको तेथे आक्रोश करीत होती.

जळू दे भारी कपडे एक नाहीतर हजार मी आणीन, पण यांना वाचवा, तेव्हा मी विचार करु लागलो शरीर महत्वाचे का कपडे?

प्रपंचात आपण कपडेच सांभाळत असतो. त्या कपड्यांत जो मानव असतो. त्याकडे आपले लक्षच नसते. मानव टिकला तर हजारो वस्त्र घेऊ शकतो व जर गेला तर त्याच्या कपड्याला काडीची किंमत रहात नाही.

आपले शरीर हे भगवंताने किती मोल किंमतीत आपणास दिले आहे. त्याला माणसाने बहुमोल किंमती वस्त्राने सजविले आहे.

आता प्रश्‍न पडतो तो असा, शरीर महत्वाचे का बहुमोल वस्त्र महत्वाचे?

प्रपंचात आपण कपड्याच्या संपर्कात रहातो. तेथे आपली कपड्याची आसक्ती लागलेली असते. तेथे फुकटात मिळालेल्या मौल्यवान शरीराची आपणास किंमत वाटत नाही. त्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याचेवर अत्याचार करतो. त्याला राब राब राबवून घेतो.

पण विकत घेतलेल्या बहुमोल किंमती कपड्यावर डाग पडला की आपण हळहळतो. त्याची घुलाईकरतो.

कारण तेथे आपण पैसा खर्च केलेला असतो.

अनेक वस्त्रे खरेदी करण्याची क्षमता असताना सुविधा असताना पुन्हा न मिळणार्‍या शरीराकडे आपले दुर्लक्ष होते.

हेच जीवनाचे सत्य माझ्या समोर आले तेेव्हा सत्य जाणून घेवू व शरीर हे महत्वाचे समजून वस्त्राकडे दूर्लक्ष करीत शरीराचे पोषण करु.

शरीर हे भगवंताने मानवाला दिलेली अमोल देणगी आहे. तिची किंमत भारी कपड्यानी करु नका.

Leave a comment