जेष्ठ नागरिक संघाची मिटींग होती. मी प्रमुख पाहुणा म्हणून मिटिंगला गेलो होतो. सभेच्या प्रथेप्रमाणे प्राथमिक सर्व आचार झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाने आपली ओळख करुन द्यावयाचा आदेश झाला.
प्रत्येक जण आपली ओळख करुन देऊ लागला. एकजण म्हणाला, मी या संघाचा अध्यक्ष आहे. मी डॉक्टर आहे. दुसरा म्हणाला मी उपाध्यक्ष आहे. मी वकील आहे. तर तिसरा उभा राहिला व म्हणाला मी कोषाध्यक्ष आहे. मी चार्टर अकाऊंटंट आहे. कोणी अभियांत्रिकी, तर कोणी इलेक्टीशीयन, तर कोणी कलाकार, कोणी कादंबरीकर, कोणी गायक असे करीत करीत प्रत्येकजणे आपली ओळख करुन देत होता.
सर्व क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती आपली ओळख करुन देत होती.
शेवटी पाळी माझी आली. मी उभा राहिलो, हात जोडून म्हणालो, ‘मी माणूस आहे’. प्रथम मी माणूस आहे. सर्वांच्या नजरा माझ्याकडे लागल्या, नजरेतून दिसत होते, मी माणूस आहे.
मग वेगळी ओळख कशासाठी असा प्रश्न त्यांचे चेहर्यावर दिसत होता.
मी फार वेळ न घेता म्हणालो, ‘मी पण तुमच्या सारखा एक माणूस आहे व मानवता हा माझा धर्म आहे. मी नुसते ज्ञान संपादन करुन पदवी प्राप्त केली नाही, तर जे ज्ञान संपादन केले त्याचा उपयोग करुन माणसाच्या मनांत मानवतेचा भाव उत्पन्न करण्याचा मी प्रयत्न केला आहे.’
माझी ओळख होण्यासाठी मला कोट, टाय, नेकटाय, घालण्याची गरज नाही.
माझे काम, माझी भक्ती, माझे प्रेमच माझी ओळख करुन देत आहे.
मी माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा लक्षांत घेवून त्या पूर्ण करण्याचा किंवा त्यासाठी सहाय्यक बनण्याचा प्रयत्न करीत आहे.
मला या जगात माणूस म्हणून जगायचे आहे. त्यामुळे माझ्यातील माया, मोह, अहंकार मी काढून टाकले आहेत.
मी निगर्वी बनुन जगण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी माणूस म्हणून जगणार आहे.