प्रपंच हा द्वैतामध्ये चालतो. प्रत्येक ठिकाणी खर्या खोट्याची परीक्षा करावी लागते. जो ही परीक्षा यशस्वी पणे पार करतो त्याला खरे ज्ञान होते.
जीवन मुक्त व सुखी करणारे जे ज्ञान ते खरे ज्ञान होय.
प्रपंचात क्षणोक्षणी एक एक गोष्टी समोर येतात. त्या प्रत्येक गोष्टी घेण्याचा आपला प्रयत्न असतो. नुसता पैस असून उपयोग नसतो. त्या वस्तुचे खरे ज्ञान त्या वस्तुचा खरा कस माहीत असणे गरजेचे असते.
जो गुणग्राहक असतो तो त्या वस्तुची योग्य पारख करतो व जीवनात आनंद, समाधान प्राप्त करतो.
ज्ञान घेताना उगाचच असंख्य वस्तुंचे ज्ञान घेत रहाण्यापेक्षा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, जीवनाला आवश्यक अशा आहेत त्याचे सखोल ज्ञान घ्यावे, इतर गोष्टीमध्ये लक्ष घालू नये.
म्हणजे ज्ञान घेताना कुठे थांबायचे हे ज्याला समजले त्याला खरे ज्ञान झाले असे वाटते. ज्ञानाचा वापर करीत करीत पुढे जायचे व योग्य ठिकाणी थांबायचे हे ज्याला कळले तो खरा ज्ञानवंत होय.
ज्ञानेश्वरीची खूप पारायणे केली पण एकही ओवीचे आचरण, आकलन केले नाही तर सर्व श्रम फोल ठरतात जो रोज एक तरी ओवी पाठ करतो त्या ओवीचे आचरण करतो त्याला खरेज्ञान झाले असे म्हणावे.
ज्ञानाचा खजीना अगाध आहे तो सर्व चराचरामध्ये भरुन आहे त्यात योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा जो विवेकी करतो त्याला खरे ज्ञान झाले असे समजावे.
दूध व पाणी याचा योग्य निवाडा करणारा राजहंस पक्षी खरा ज्ञानी समजला जातो.
काचेचे मणी व उत्तम हिरा याची जो पारख करतो तो खरा जण्हेरी समजला जातो.
प्रपंचात काय किंवा परमार्थात काय खरे ज्ञान असणे गरजेचे आहे. खरे ज्ञान प्राप्त झाले की माणसाची द्वैत बुद्धी थांबते.
ईश्वर सर्वत्र एकच आहे. सर्व प्राणीमात्रांत एकच आत्मा संचार करीत असतो.
हे ज्ञान होते, हे खरे ज्ञान होय. प्रत्येकाने या ज्ञानाचा शोध घ्यावा.