कालाय तस्मै नम:।
जीवनचा चित्रपट समोर येताना या वाक्याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते.
लहान मुले पुढची पुढची स्वप्ने पहातात. तरुण आज समोर असणार्या स्वप्नांना साकारण्याचा प्रयत्न करीत असतो तर जेष्ठ मंडळी भूतकाळाकडे पहात दिवस घालवीत असतात. जेष्ठ मंडळी नेहमी आपला भूतकाळ समोर ठेवून वागत असतात.
आमच्यावेळी असे होते आमच्या वेळी तसे होते. तुम्ही असे करा तसे करु नका अशी भाषा वापरत असतात.
या ठिकाणी जेष्ठांची आपल्यात थोडा बदल करणे गरजेचे आहे. बदलत्या काळाची पाऊले ओळखून तरुणांचा दृष्टीकोन जेष्ठांनी स्विकारायला पाहिजे तरच त्यांच्या अनुभवातून सुंदर भविष्य निर्माण होईल.
त्यांनी काळाबरोबर विचारांचे चक्र सकारात्मक फिरविले पाहिजे. असलेल्या परिस्थितीशी एकरुप झाले पाहिजे तरच नवी पिढी त्यांचा सन्मान करेल.
त्यांना समजावून घेईल व जेष्ठांचे जीवन आनंदी होईल. जर फाटलेल्या दुधातून रसगुल्ले करता येतात तर विस्कटलेल्या कुटुंबाची घडी जेष्ठांना का बरे करता येणार नाही?
यासाठी जेष्ठांनी भूतकाळाकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. ती दृष्टी भविष्य काळाकडे वळविली पाहिजे. यातून जेष्ठ स्वत:ला बदलु शकतात.
हा त्यांच्या अनुभवाचा प्रताप आहे. ज्या देशात ज्या कुटुंबात अशी भविष्याकडे पहाणारी जेष्ठ मंडळी आहेत त्या देशाचे त्या कुटुंबाचे भवितव्य नक्कीच थोर आहे असे मला वाटते.
तेव्हा कालाय तस्मै नम:।
जेष्ठांनो तुम्ही श्रेष्ठ आहात आम्ही तुम्हाला वंदन करतो.
काळ तुमच्या समोर भरारी घेत आहे. वेगाने पुढे पुढे जात आहे त्याला तुमच्या अनुभवातून सृष्टीच वश करा. त्याचेवर विजय मिळवा.
येणार्या परिस्थितीला धिराने तोंड द्या उगवत्या सूर्याला नमस्कार करा तो तुमचे रक्षण करील.
कालाय तस्मै नम:।